Pankaja Munde : राजकारण सोडावं असं रोज वाटतं पण... पंकजा मुंडेंनी खदखद बोलून दाखवली!
Pankaja Munde Live News : सत्ता नसतानाही आमच्या नेत्यांमध्ये आत्मविश्वास होता, परंतु सध्याच्या राजकारण्यांमध्ये ती गोष्ट दिसत नसल्याचं भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
Pankaja Munde Retire From Politics : सध्याचं राजकारण हे पूर्वीसारखं राहिलेलं नाही, नेत्यांना अनेक गोष्टी स्वत:च्या मनाविरुद्ध जाऊन कराव्या लागतात. त्यामुळं मला राजकारण सोडून द्यावं असं रोज वाटतं, परंतु विचारांशी तडजोड करून राजकारण करू शकत नाही, अनेक गोष्टींवर मात करून मी जिद्दीने काम करत असल्याचं सांगत भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांनी मनातली खदखद बोलून दाखवली आहे. एबीपी माझाच्या एका कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांनी निवृत्तीचे संकेत दिले आहे. त्यामुळं त्यांच्या वक्तव्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
मला राजकारण सोडायचं आहे, असं मी १ जून २०१४ साली बाबांना (गोपीनाथ मुंडे) सांगितलं होतं. परंतु पुढील दोनच दिवसांत त्यांचा मृत्यू झाला. राजकारणात निगरघट्ट असावं लागतं. अनेक चुकीच्या बाबींकडे दुर्लक्ष करावं लागतं, त्यामुळं राजकारण सोडून द्यावं असं मला रोज वाटतं. परंतु पुन्हा जिद्दीने उभं राहण्याची आणि काम करण्याची शक्ती येते. विचारांशी तडजोड करून मी राजकारण करू शकत नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. सत्ता नसतानाही आमच्या नेत्यांमध्ये आत्मविश्वास होता, परंतु सध्याच्या राजकारण्यांमध्ये ती गोष्ट दिसत नसल्याचं सांगत भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला हाणला आहे.
'जनतेच्या मनातली मुख्यमंत्री' या वक्तव्याचा मला कधीही त्रास झाला नाही. ज्याला ही गोष्ट मला चिकटवायची असेल तर त्याला ते करू द्यायला हवं. उलट मी यासाठी त्यांचे आभार मानत असते, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यात सुप्त संघर्ष सुरू असल्याच्या चर्चा आहे. परळीतून पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांना तीन वेळा विधानपरिषदेची उमेदवारी नाकारण्यात आली. उलट पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय रमेश कराड यांना भाजपाकडून आमदारकी देण्यात आली. त्यामुळं पंकजा मुंडे या फडणवीसांवर नाराज असल्याचं बोललं जात आहे.