Congress: हवाई दलाच्या कार्यक्रमात पंडितांबरोबरच मौलवींकडूनही प्रार्थना, काँग्रेस म्हणते...
Congress Vs BJP: हवाई दलाच्या ताफ्यात नव्या लढाऊ हेलिकॉप्टर्सचा समावेश करताना सर्वधर्मीय प्रार्थना केल्या गेल्या. त्यावरून काँग्रेसनं भाजपला चिमटा काढला आहे.
Congress Vs BJP: भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात आता आज स्वदेशी बनावटीच्या १० लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टरचा समावेश करण्यात आला. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात पंडितांच्या मंत्रोच्चाराबरोबरच, मौलवी, शीख व ईसाईंच्या प्रतिनिधींकडूनही प्रार्थना करून घेण्यात आल्या. त्यावरून काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
'राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेनं देशातील वातावरण ढवळून निघालं आहे. या पदयात्रेला सर्व जाती-धर्माच्या लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेची दखल भाजप व आरएसएसला घ्यावी लागत आहे. जोधपूरमधील कार्यक्रमात सर्वधर्मीय प्रतिनिधींकडून करून घेण्यात आलेली प्रार्थना हे त्याचंच द्योतक आहे. भारत जोडो यात्रेमुळंच भाजपला सर्व धर्मसमभावाची आठवण झाली आहे, असा टोला लोंढे यांनी हाणला आहे.
'सातत्यानं हिंदू-मुस्लीम वाद उकरून काढून आपलं राजकीय उद्दिष्ट साध्य करणाऱ्या भाजपला मौलवींची आठवण व्हावी, त्याच कार्यक्रमात शीख, खिश्चन धर्मातील प्रतिनिधींनाही बोलावणं हा काही योगायोग नक्कीच नाही. गुजरातमधील अहमदाबादमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेवरही ‘भारत जोडो’ यात्रेचं सावट पडलेलं दिसतं. खेलेगा भारत, जुडेगा भारत, अशी कॅप्शन देण्यात आली आहे. हा बदल चांगलाच आहे, पण भारत जोडो यात्रेनं भाजपंला द्वेषाचं राजकारण बाजूला ठेवण्यास भाग पाडलं आहे, असा दावा लोंढे यांनी केला आहे.
'भारत जोडो यात्रेचा उद्देशच भारताची विविधतेतील एकता अबाधित ठेवणं हा आहे, त्याला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राहुल गांधी यांना मिळणारा प्रतिसाद पाहूनच भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आपण इतर धर्माच्या विरोधात नाही हे दाखवावं लागत आहे. सरसंघचालक मोहन भागवत दिल्लीच्या मशिदीत जाऊन इमाम इलिसासी यांची भेट घेऊन आले हे काही सहज घडलेलं नाही, हा बदल भारत जोडो यात्रेचं मोठं यश आहे. भारत जोडो यात्रेनं आता ५०० किमीचे अंतर पार केलं असून अद्याप ३ हजार किमीचं अंतर पार करायचं आहे. ही यात्रा जसजशी पुढे जात राहील, तसतसे अजून बदल पहायला मिळतील. देशातील वातावरण बदलून २०२४ च्या निवडणुकीत हुकूमशाही व अहंकारी सत्ताधाऱ्यांचा पराभव व लोकशाहीचा विजय कोणीही रोखू शकणार नाही, असा विश्वास लोंढे यांनी व्यक्त केला आहे.