Salman Khan latest news : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा कट रचणाऱ्या लाँरेन्स बिश्नोई टोळीच्या चार शार्प शूटर्सना नवी मुंबई पोलिसांनी आज अटक केली. हे चौघे पनवेल इथं सलमान खानवर हल्ला करण्याचा कट रचत होते, अशी माहिती पुढं आली आहे. त्यामुळं सलमानच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
काळवीट शिकार प्रकरणाच्या कायदेशीर कारवाईतून सुटलेल्या सलमान खान याला बिश्नोई टोळीकडून धोका आहे. बिश्नोई टोळीनं याआधी अनेकदा त्याला धमक्या दिल्या आहे. काही दिवसांपूर्वी सलमानच्या घरावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता सलमानवर मोठा हल्ला करण्याचा कट रचला जात होता. या शूटर्सना सलमान खानच्या पनवेल येथील फार्म हाऊसजवळ अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलिसांनी या कटाचा पर्दाफाश केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे चौघेही रात्री उशिरा सलमान खानच्या फार्महाऊसची रेकी करत होते. लॉरेन्स बिश्नोई टोळीचे काही लोक पनवेलमध्ये असून ते सलमान खानच्या हत्येचा कट रचत असल्याची माहिती पोलिसांना आधीच मिळाली होती. अटक करण्यात आलेल्या चौघांनी पाकिस्तानी पुरवठादारांसोबत तीन प्रकारची शस्त्रे खरेदी करण्याचा सौदे केल्याचंही समोर आलं आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीनं या हल्ल्याची पूर्ण प्लानिंग केली होती. सलमान खानवर धोकादायक शस्त्रांनी हल्ला करण्याची योजना होती. त्यांच्या फार्म हाऊसजवळ हा हल्ला करायचा, अशीही योजना होती.
पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. धनंजय उर्फ अजय कश्यप, गौरव भाटिया उर्फ न्हवी, वास्पी खान उर्फ वसीम चिकना आणि रिजवान खान उर्फ जावेद खान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी लॉरेन्स बिश्नोई, अनमोल बिश्नोई, संपत नेहरा, गोल्डी ब्रार यांच्यासह १७ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
एक महिन्यापूर्वी सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या घराबाहेर मोटारसायकलस्वारांनी गोळीबार केला होता. त्यानंतर दोन्ही आरोपींना गुजरातमधून अटक करण्यात आली. विकी गुप्ता आणि सागर पाल अशी त्यांची नावे होती. त्यानंतर या प्रकरणाशी संबंधित अनुज थापनला पंजाबमधून अटक करण्यात आली. यानंतर १ मे रोजी मुंबई पोलिसांच्या लॉकअपमध्ये थापनचा मृत्यू झाला.
संबंधित बातम्या