ST Aurangabad : औरंगाबादच्या नामांतराआधीच झळकले संभाजीनगरचे बोर्ड; एसटी महामंडळाचा नवा निर्णय वादात
Aurangabad Name Change : औरंगाबादच्या नामांतराआधीच एसटी महामंडळानं शिवशाही बसच्या डिजिटल बोर्डवर संभाजीनगरचा उल्लेख केल्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
Aurangabad Name Change Sambhajinagar : ठाकरे सरकारनं महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला होता. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारनं ठाकरे सरकारनं घेतलेला निर्णय रद्द करत पुन्हा नव्यानं शहराचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला. परंतु या निर्णयाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच एसटी महामंडळानं शासकीय बसेच्या फलकांवर औरंगाबादऐवजी छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख असणारे बोर्ड लावल्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. यापूर्वी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी औरंगाबाद शहराचा उल्लेख संभाजीनगर केल्यानं त्यावर खासदार इम्तियाज जलील यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर आता एसटी महामंडळाचा आताताईपणा उघड झाल्यानं अनेकांचा भूवया उंचावल्या आहेत.
ट्रेंडिंग न्यूज
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं शिवशाही बसच्या डिजिटल बोर्डावर औरंगाबादऐवजी छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख केला आहे. याशिवाय बसस्थानकांवरील फलटांवरील बोर्डांवरही छत्रपती संभाजीनगरचे बोर्ड झळकले आहेत. त्यामुळं औरंगाबादच्या नामांतराची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली नसतानाच एसटी महामंडळानं घेतलेल्या या निर्णयावरून नवं राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.
औरंगाबादच्या नामांतराची स्थिती काय?
शिंदे-फडणवीस सरकारनं राज्यातील औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव असं नामांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय नवी मुंबईतील विमानतळाचं नाव दि. बा. पाटील विमानतळ असं करण्यात आलं आहे. राज्य सरकारनं नामांतर केल्यानंतर याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवला आहे. त्याला जवळपास चार महिन्यांचा कालावधी लोटलेला असतानाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली नाही.
शहरांचं संपूर्ण नामांतर कधी होईल?
राज्य सरकारनं शहरांच्या नामांतराचा ठराव केंद्र सरकारकडे पाठवल्यानंतर जर त्याला केंद्रानं मंजुरी दिली तर शहराचं नाव बदलण्याचं अंतिम निर्णय होतो. त्यानंतर प्रशासकीय पातळीवरही शहराचं नाव बदलण्यात येतं. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारनं उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतील आठ शहरांच्या नामांतराला मंजुरी दिली आहे.