Beed Accident News: बीड जिल्ह्यात मंगळवारी (१० डिसेंबर २०२४) पहाटे भीषण अपघात घडला. अंबाजोगाईजवळील वाघळा येथे कार आणि ट्रकच्या धडकेत चार मित्रांचा मृत्यू झाला आहे. तर, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. मित्राची राज्य राखीव पोलीस दलात (एसआरपीएफ) निवड झाल्यामुळे हे मित्र आनंद साजरा करण्यासाठी जेवायला गेले होते. मात्र, घरी परतताना त्यांच्या कारला अपघात झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार,कारेपूर गावात राहणारा अजीम पश्मिया शेख (वय, ३०) याची नुकतीच एसआरपीएफमध्ये निवड झाली. त्यामुळे तो आणि त्याचे पाच मित्र सोमवारी रात्री मांजरसुंभ येथे पार्टी करायला गेले. मात्र, पार्टी करून घरी परतताना छत्रपती संभाजीनगर-लातूर मार्गावर त्यांची कार ट्रकला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, तीन मित्रांचा जागीच मृत्यू झाला. तर, तीन जण गंभीर जखमी झाले. त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान आणखी एका मित्राचा मृत्यू झाला. इतर, दोन जणांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. या घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजी शंकर माने (वय, २७), दीपक दिलीप सावरे (वय, ३०) आणि फारुख बाबू मिया शेख (वय, ३०), ऋतिक हनुमंत गायकवाड (वय, २४) असे या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर, अजीम पश्मिया शेख (वय, २८) आणि मुबारक सत्तार शेख (वय, २८) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात नेमका कशामुळे झाला? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी अस्कमित मृत्युची नोंद केली असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
संबंधित बातम्या