शिवसेनेतल्या नाराजीनाट्यानंतर काँग्रेसमध्येही कलह, 'हा' मंत्री देणार राजीनामा
प्रदेश काँग्रेसचा (Congress) एक मोठा नेता आता राजीनामा देण्याच्या तयारीत आहे. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) या सर्व घडामोंडींच्या पार्श्वभूमीवर आता राजीनामा द्यायच्या तयारीत आहेत.
विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना (Shiv Sena) आणि भाजपची (BJP) फुटलेली मतं. त्यानंतर शिवसेनेचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सोमवारी संध्याकाळी ५ वाजल्यापासून नॉट रिचेबल असणं, त्यानंतर शिंदे सुरतला असल्याचं समजणं, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)अचानक दिल्लीला पोहोचणं या सर्व सूचक घटना महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडण्याची ग्वाही देत असताना आता प्रदेश काँग्रेसच्या गटातनंही एक अस्वस्थ करणारी बातमी समोर येत आहे.
प्रदेश काँग्रेसचा एक मोठा नेता आता राजीनामा देण्याच्या तयारीत आहे. बाळासाहेब थोरात या सर्व घडामोंडींच्या पार्श्वभूमीवर आता राजीनामा द्यायच्या तयारीत आहेत. काल झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार निवडून आले मात्र त्याचवेळेस पहिल्या पसंतीचे काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. पहिल्या क्रमांकाची पसंती असलेला उमेदवार हरतो याची जबाबदारी घेत, आता महसूल मंत्री असलेले बाळासाहेब थोरात विधिमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. तशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
विधानसभेत काँग्रेसच्या एकंदरीत आमदारांची संख्या ४४ असताना काँग्रेस उमेदवार चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप यांना पहिल्या पसंतीची ४१ मतं मिळाली असल्यानं आता काँग्रेसची ३ मतं फुटल्याचं उघड झालं होतं. काँग्रेसने शिवसेनेकडे पहिल्या पसंतीची ४ मतं मागितली होती खरी मात्र महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी काँग्रेसला मदत केली केली की नाही असा प्रश्न बाळासाहेब थोरात यांना विचारण्यात आल्यावर त्यांनी आमच्याच पक्षाची मतं फुटली, तर इतरांना काय दोष देणार, असं म्हणत नाराजी व्यक्त केली होती.
सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकीकडे जिथे भाजपचे राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले असतानाच दुसरीकडे आता प्रदेश काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आणि आमदारही आज दिल्लीत जाणार असल्याचं समजतंय हे सर्व आमदार आज दिल्लीत काँग्रेस नेते पक्ष नेतृत्त्वाची भेट घेणार आहेत. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होताना पाहायला मिळत आहे. आगामी काळात महाविकास आघाडी सरकार तरतं की नाही हे पाहाणं महत्वाचं असणार आहे.