Auto Driver Kills Girlfriend in Virar: विरार येथील एका रिक्षाचालकाने किरकोळ वादातून विवाहित प्रेयसीची गळा आवळून हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी ३४ वर्षीय आरोपीला अटक केली. मृत महिलेचा पती कामावर आणि मुले शाळेत गेली असताना ही घटना घडली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
धनश्री आंबेडकर (वय ३२) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून ती पती रुपेश (वय, ३७) आणि मुलांसोबत राहत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती आणि मुले गेल्यानंतर आरोपी कदम हा सकाळी धनश्रीच्या घरी गेला. त्यानंतर दुपारी धनश्री बेशुद्ध असल्याची माहिती शेजाऱ्यांना दिली. धनश्रीला जवळच्या संजीवनी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. यानंतर आरोपी कदमने घटनास्थळावरून पळ काढला.
दुपारी तीनच्या सुमारास शेजाऱ्याने माहिती दिल्यानंतर पीडितेच्या पतीने विरार पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. धनश्रीचे कदम याच्यासोबत गेल्या पाच वर्षांपासून विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती रुपेशने दिली. सहा महिन्यांपूर्वी कुटुंबीयांनी धनश्री आणि कदमला एकमेकांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. मात्र, तरीही हे दोघे कुटुंबीयांच्या इच्छेविरुद्ध एकमेकांना भेटत राहिले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनश्री बेशुद्धावस्थेत आढळली तेव्हा कदम घरात उपस्थित होते, अशी माहिती रुपेशने पोलिसांना दिली. मात्र, त्यावेळी धनश्रीचा खून झाला आहे का, याबाबत पोलिसांना साशंकता होती. मंगळवारी मध्यरात्री एकच्या सुमारास डॉक्टरांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता तिचा गळा दाबून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी कदम यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला त्यांच्या राहत्या घरातून अटक केली. कदमच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अन्वये अटक करण्यात आली.
दरम्यान, पोलिसांनी हत्येमागचे कारण विचारले असता कदम म्हणाला की, धनश्रीने लग्नाचा आग्रह धरल्याने दोघांमध्ये वाद झाला. या वादातून आरोपी कदमने धनश्रीचा गळा आवळून हत्या केल्याची कबूली दिली. आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात येईल, अशी माहिती विरार पोलिस ठाण्यातील एका पोलिस अधिकाऱ्याने दिली.
संबंधित बातम्या