Noise Pollution from Dogs Barking in Pune: वाढत्या वाहनांमुळे पुण्यात मोठ्या प्रमाणात वायु प्रदूषणाची समस्या तयार झाली आहे. त्यात मोठ्याने होणाऱ्या आवाजामुळे देखील पुणेकर त्रस्त झाले आहेत. ध्वनि प्रदूषणाला वाहनांचे, गाण्यांचे मोठे आवाज कारणीभूत असल्याचं म्हटलं जातं. पण आता कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे देखील ध्वनि प्रदूषण होत असून यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी एका पुणेकर नागरिकाने थेट महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली आहे. या तक्रारीमुळे अधिकारी देखील चक्रावले असून कारवाई कशी करावी ? या संभ्रमावस्थेत अधिकारी आहेत.
पुण्यातील बाणेर परिसरात राहणाऱ्या एका नागरिकाने या परिसरात कुत्र्याच्या भुंकण्यामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाबाबत तक्रार केली आहे. या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी देखील या नागरिकाने केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पुणे महापालिकेसह अधिकारी याबाबत काय कारवाई करू शकतात व ही कारवाई कुणी करावी या बाबत अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
बाणेर येथे राहणाऱ्या या तक्रार दाराने नाव न छापण्याच्या अटीवर माहिती देतांना सांगितले की, एमपीसीबी व इतर अधिकाऱ्यांना या समस्ये बाबत ई-मेल लिहून ११ डिसेंबर रोजी तक्रार दिली आहे. कुत्र्याच्या भुंकण्याच्या आवाजामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास होत आहे. कुत्र्यांचा आवाज मोठा असल्याने रात्री झोपेत असणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. कुत्र्यांचा आवाज हा ध्वनि प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणाऱ्या डेसीबल इतका असतो. त्यामुळे या प्रकरणी कडक कारवाई करावी अशी मागणी या नागरिकाने केली आहे. जर या प्रकरणी कारवाई करण्यात आली नाही तर राष्ट्रीय हरित लवादाकडे (एनजीटी) देखील तक्रार दाखल करण्याची तयारी या तक्रार दाराने केली आहे.
या प्रकरणी तक्रारदाराने म्हटले आहे की, कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे व प्राण्यांच्या आवाजामुळे (बायोलॉजिकल लाऊडस्पीकर) ध्वनी प्रदूषण होत आहे. याचा मानवावर होणारा परिणाम इतर प्रकारच्या ध्वनि प्रदूषणाईतकाच आहे. कुत्रे भुंकतात तेव्हा त्यांची लाळ ही हवेत वेगाने सूक्ष्म रूपात पसरली जाते. त्यामुळे अॅलर्जी सारखे रोग पसारण्याची शक्यता असते. कुत्र्यांच्या आवाजामुळे ध्वनि प्रदूषण व अॅलर्जी या दोन्ही बाबी मानवी आरोग्यासाठी हानिकारक आहेत. कुत्र्यांच्या भुंकण्याची पातळी ही ११३.१ डेसिबल (डीबी) पर्यंत होती. भुंकणाऱ्या कुत्र्याच्या आवाजाची पातळी ८० ते ८० डेसिबल दरम्यान असून एखाद्या परिसरात भटक्या कुत्र्यांचा समूह आवाजाची ही पातळी एकत्र भुंकण्यामुळे बदलू शकतो असे देखील तक्रारदाराने निदर्शनास आणून दिले आहे. या समस्येकडे लक्ष देण्यास प्रशासन अपयशी ठरल्याने कायद्याचे उल्लंघन होत असून, रहिवाशांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हायला हवी, अशी मागणी तक्रार दाराने केली आहे.
एमपीसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर माहिती दिली की, "दररोज आम्हाला नागरिकांकडून अशा तक्रारी येतात. कुत्र्याच्या भुंकण्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करणारे ई-मेल देखील आम्हाला अनेकदा आले आहेत. ही तक्रार खरी आहे. या बाबत नागरिक संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करू शकतात. मात्र, या प्रकरणी कारवाई काय करावी या बाबत आम्हीच संभ्रमावस्थेत आहोत. भुंकणाऱ्या कुत्र्यांवर कारवाई करण्याबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे नसल्यामुळे एमपीसीबी किंवा अन्य कोणतीही सरकारी यंत्रणा या प्रकरणी कारवाई करू शकत नाहीत, असे या अधिकाऱ्याने म्हटलं आहे.
पुणे महानगर पालिकेचे मनपाचे पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे म्हणाले, 'माझ्याकडे अद्याप अशी कोणतीही तक्रार आलेली नाही, मात्र कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे होणाऱ्या आवाजावर कारवाई करण्याबाबत कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे नाहीत. कुत्रा चावणे आणि कुत्र्यांची संख्या नियंत्रण यासारख्या समस्या सोडविण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे अस्तित्वात आहेत. परंतु कुत्र्याच्या भुंकण्यामुळे होणाऱ्या आवाजावर कोणती कारवाई करावी या याबात नव्याने मार्गदर्शन तत्वे तयार करण्याची गरज आहे. याबाबत बाणेरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोलकोटगी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या बाबत कोणतीही तक्रार आणि नसल्याचे सांगितले.
पुण्यातील प्राणी कल्याणाबाबत काम करणाऱ्या शाश्वत फाऊंडेशनच्या संस्थापक आशा आंबेकर म्हणाल्या, 'कुत्री ही भुंकण्याच्या माध्यमातून व्यक्त होत असतात. भुंकणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे. अनेक कारणांमुळे कुत्री भुंकत असतात. भूक किंवा आरोग्याच्या समस्यांमुळे ते भुंकु शकतात. त्यामुळे कुत्री का भुंकतात याचे मूळ कारण शोधले पाहिजे. त्या नंतर या समस्येवर उपाय शोधता येईल. कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाबाबत अद्याप कोणतीही योग्य मार्गदर्शक तत्त्वे नसली तरी माणूस म्हणून श्वानांशी उद्धट वागू नये. या जगात इतर प्राणीही वावरत आहेत, हे आपण ओळखले पाहिजे. तसेच प्राण्यांप्रती आपण सहिष्णू असायला हवे, असे देखील आंबेकर म्हणाल्या.
संबंधित बातम्या