Devendra Fadnavis : विरोधक पेपरफुटीच्या मुद्यावर बोलत आहेत, पण सर्वात जास्त पेपरफुटीची प्रकरणे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाली आहेत. जवळपास सर्वच परीक्षांमध्ये पेपरफूट झाली होती, आणि ते आम्हाला प्रश्न विचारत आहेत. आमच्या सरकारकडून ज्या परीक्षा घेण्यात आल्या, त्याचा लेखाजोखा या अधिवेशनात मांडणार आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. पेपरफूट आणि नोकर भरतीत सर्वाधिक घोटाळे महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाल्याचा आरोपही फडणवीसांनी केला.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला होता. शेतकऱ्यांचे प्रश्न, कायदा व सुव्यवस्था आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे असूनही सरकार गंभीर नाही. त्यामुळे सरकारच्या चहापान निमंत्रणावर बहिष्कार घालत असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेऊन सांगितले. यानंतर सत्ताधारी महायुतीने पत्रकार परिषद घेत विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमची चर्चेची तयारी आहे, सर्वांची उत्तरे देऊ. विरोधी पक्षाने जे पत्र दिले, ते खोटे बोल पण रेटून बोल, असे आहे. त्यांनी आरशात आपला चेहरा पहावा. विदर्भातील एकही प्रकल्पाला ज्यांनी मान्यता दिली नाही, ते आरोप करतात. आम्ही तर सर्व मान्यता आणि निधी दिला. वैधानिक विकास मंडळ त्यांनी बंद केले, ते आम्हाला विचारतात? मराठवाडा वॉटर ग्रीड त्यांनी स्थगिती दिली, ते आम्हाला विचारतात?
उद्योग आणि गुंतवणुकीत त्यांच्या काळात तीन ते चार नंबरवर गेलेला महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या काळात गेल्या २ वर्षांपासून पहिल्या क्रमांकवर आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
विरोधक, विदर्भातील संचिनाचा मुद्दा उपस्थित करतात मात्र ज्यांनी विदर्भातील एकाही प्रकल्पाला सुप्रमा दिली नाही तेच आता आम्हाला सांगत आहेत. पण आमच्या सरकारने केवळ सुप्रमाच दिली नसून कामही सुरू केले आहे, असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी मीडियाशी बोलताना म्हटले होते की, उद्यापासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन होत आहे. महायुतीच्या खोके सरकारचे हे निरोपाचे अधिवेशन आहे. यावर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदे यांना विचारण्यात आल्यावर त्यांनी खोचक शब्दांत पलटवार केला. लोकांच्या मनातले सरकार आम्ही बनवले. आज त्यांच्यापेक्षा आम्हाला लोकांनी जास्त मते दिली. काही लोक म्हणाले की, हे निरोपाचे अधिवेशन आहे. आता निरोप देण्यासाठी सभागृहात तर यायला पाहिजे ना? की फेसबुक लाईव्हवरूनच निरोप देणार? निरोप द्यायचा की घ्यायचा हे जनता ठरवत असते, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
संबंधित बातम्या