Congress: आशिष शेलारांचा राज्यात दंगल पेटवण्याचा प्रयत्न, त्यांना अटक करा; काँग्रेसची मागणी
Congress On Ashish Shelar: आशिष शेलारांचा राज्यात दंगल पेटवण्याचा प्रयत्न असून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
Maharashtra Politics: भाजप नेते आशिष शेलार यांनी मणिपूरमधील गोहत्येचा व्हिडिओ कर्नाटक येथील असल्याचे खोटे सांगून राज्यातील वातावरण दंगल घडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. राज्यात समाजिक द्वेष निर्माण करण्यासाठी आशिष शेलार आणि नितेश राणे सातत्याने प्रक्षोक्षक विधाने करताना दिसत आहेत, असाही त्यांनी आरोप केला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
अतुल लोंढे म्हणाले की, हिमाचल प्रदेशनंतर कर्नाटकातही भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावा लागले आहे. काँग्रेसकडून मिळालेल्या पराभवाचे दु:ख भाजपला पचवता आले नाही. देशातील नागरिक मोदी- शाहांच्या द्वेषाच्या राजकारणाला कंटाळली आहेत, देशात भाजपचा जनाधार घटत चालला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभवाची भिती वाटू लागली आहे. यामुळे भाजपचे काही नेते जनतेची माथी भडकावून समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असेही लोंढे म्हणाले.
पुढे लोंढे म्हणाले की, आशिष शेलार यांनी मणिपूर येथील गोहत्येचा व्हिडिओ दाखवण्यापूर्वी त्याची खात्री करून घेतली पाहिजे होती. परंतु, त्यांनी तसे न करता जाणीवपूर्वक हा व्हिडिओ जनतेला दाखवून त्यांनी काँग्रेसविरोधी वातावरण बनवण्याचा प्रयत्न केला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे फक्त विरोधी पक्षांच्या नेते व कार्यकर्त्यांवर पोलीस कारवाई करतात. पण स्वतःच्या पक्षाच्या नेत्यांवर कारवाई करत नसल्याचा आरोप लोंढे यांच्याकडून करण्यात आला आहे.