राज्यात विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात सोयाबीन पिकाची कापणी होऊन तयार सोयाबीन शेतकऱ्याच्या घरात दाखल झालेलं आहे. राज्यात यंदा सोयाबीनचे उत्पादन चांगले झाले आहे. परंतु बाजारात सोयाबीनला योग्य भावच मिळत नसल्याने संपूर्ण राज्यात शेतकरी संतप्त झाले आहे. दिवाळी सण अगदी जवळ आला आहे. सणासुदीची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्याला हातात लवकर पैसे हवे असल्याने मातीमोल भावाने सोयाबीन विकावे लागत असल्याचे चित्र संपूर्ण राज्यात दिसून येत आहे. दुसरीकडे केंद्र सरकारने खाद्य तेलावरील आयात शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे सोयाबीन तेलाचे भाव कडाडले. त्यामुळे एकीकडे बाजारात सोयाबीनची विक्री करताना हातात येणारा भाव फक्त ३२०० रुपये तर दुसरीकडे बाजारातून सोयाबीनचा १५ किलो वजनाचा पिंप खरेदी करताना २२०० रुपये मोजावे लागत असल्याने शेतकरी संतप्त झाला आहे. शेतकऱ्यांची नेमकी ही व्यथा मांडणारा एका तरुण शेतकऱ्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. राष्ट्रवादी कॉंग्रेस-शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये हा तरुण शेतकरी हातात सोयाबीन विक्रीची पावती दाखवत 'अगा एकनाथ मामा, सोयाबीन बत्तीश्श्यानं गेली रे, पाह्य रे बापू…सोयाबीच्या पिपा २२००चा झाला आणि माझे सोयाबीन ३२०० ने गेले गा.. एकनाथ मामा… ओए एकनाथ मामा' असं उद्देश्यून बोलताना दिसत आहे. व्हिडिओच्या माध्यमातून हा तरुण शेतकरी हसत हसतच एकप्रकारे कटू वास्तव मांडताना दिसतोय.
राज्य सरकारने सोयाबीनसाठी प्रती क्विंटल ४,८९२ रुपये इतका हमीभाव आधीच जाहीर केला आहे. परंतु सध्या बाजारात नवीन सोयाबीनला केवळ प्रती क्विंटल ३२०० रुपये एवढाच भाव मिळतो आहे. दिवाळीपूर्वी नाईलाज म्हणून शेतकऱ्यांना घरात आलेला सोयाबीन कमी दरात विकावा लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजीची भावना दिसून येत आहे. अनेक जिल्ह्यामध्ये सरकारी खरेदी केंद्र सुरू न झाल्याने बहुतांश शेतकरी हा सोयाबीनची खुल्या बाजारातच विक्री करताना दिसत आहे.
दरम्यान, यंदा महाराष्ट्रात १३ लाख टन सोयाबीन प्रती क्विंटल ४८९२ रुपये हमीभाव देऊन शेतकऱ्यांकडून खरेदी केला जाईल अशी घोषणा राज्य सरकारने केली होती. राज्यात ९० दिवस हमीभाव केंद्रे सुरू राहतील असे सरकारतर्फे जाहीर करण्यात आले होते. हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी सरकारकडून ४७८ खरेदी केंद्रे सुरू करण्यासाठी परवानगी दिली होती. त्यापैकी ३७१ सरकारी खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहे. मात्र सोयाबीन खरेदी करताना त्यात किमान १२ टक्केच ओलावा असावा अशी अट सरकारी खरेदी केंद्राकडून घालण्यात आली आहे. सध्या नव्या सोयाबीनमध्ये १८-२० टक्क्यापर्यंत ओलावा दिसून येत आहे. नेमक्या या अटीमुळे शेतातून काढण्यात आलेला ताजा, नवीन सोयाबीन शेतकरी सरकारी खरेदी केंद्रात विक्रीसाठी न नेता खुल्या भावात विकतोय. तेथे त्याला कवडीमोल दर मिळतोय. ओलाव्याच्या अटीमुळे आतापर्यंत ४,७७० क्विंटल सोयाबीन सरकारी खरेदी केंद्रांकडून हमीभावाने खरेदी करण्यात आल्याची माहिती पणन विभागाकडून देण्यात आली आहे.
संबंधित बातम्या