आनंद दिघेंचा घात की अपघात?, लवकर उलगडा करा; मनसेची ठाण्यात बॅनरबाजी
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्याबाबत वक्तव्य केलं होतं, त्यानंतर आता ठाण्यात मनसेनं बॅनरबाजी केल्याचं पाहायला मिळत आहे.
MNS Banner On Anand Dighe In Thane : शिवसेनेत बंड झाल्यापासून शिंदेगट आणि शिवसेनेतील नेत्यांमध्ये मोठा राजकीय संघर्ष होत असल्याचं दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांनी आधी ४० आमदारांच्या पाठिंब्यानं भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती, त्यानंतर त्यांना पक्षातील १२ खासदारांसह स्थानिक पातळीवरील अनेक नेत्यांनी पाठिंबा दिला होता. परंतु काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मालेगांवातील एका आयोजित सभेत शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्याबाबत खळबळजनक दावा केला होता. त्यानंतर आता त्यावरून मनसेनं ठाण्यात बॅनरबाजी करून या प्रकरणाचा उलगडा करण्याचं आव्हान मुख्यमंत्र्यांना दिलं आहे.
काय म्हणाले होते मुख्यमंत्री?
मालेगांवातील एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते की, आनंद दिघेंसोबत जे झालं त्याचा मी साक्षीदार आहे, ज्यावेळी मी या विषयावर मुलाखत देईल तेव्हा राज्यात आणि देशात राजकीय भूकंप होईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता. त्यानंतर आता मनसेनं या प्रकरणात ठाण्यात बॅनरबाजी करत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
ठाण्यात मनसेनं झळकावले बॅनर...
मुख्यमंत्र्यांची होम पीच असलेल्या ठाण्यात आनंद दिघेंबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याचा आधार घेत मनसेनं बॅनरबाजी केली आहे, ठाण्यातील चंदनवाडी भागामध्ये मनसेचे कार्यकर्ते असलेल्या महेश कदम यांनी हे बॅनर लावलं आहे.
त्यात लिहिलंय की, २६ ऑगस्ट २००१ ला आमच्या धर्मविरांचं काय झालं होतं?, घात की अपघात?, लवकरात लवकर ठाणेकरांना याचा उलगडा झालाच पाहिजे, असं आव्हान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना देण्यात आलं आहे. त्यामुळं आता मनसेच्या या बॅनरबाजीला शिंदेगटाकडून काही उत्तर मिळेल का, याकडंही सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
संबंधित बातम्या