Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी प्रमुख पक्षांचे बहुतेक उमेदवार ठरल्यामुळं आता रंगत वाढली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले चिरंजीव अमित ठाकरे यांना माहीम विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतरवलं आहे. उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर घेतलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत त्यांनी अमित यांनी जोरदार टोलेबाजी केली.
'आमच्या तीन पिढ्या माहीम-दादर भागात वाढल्या आहेत. मी या भागात अनेकदा फेरफटका मारतो. सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी चालत जातो. अनेक लोक मला भेटतात. माझ्याशी बोलतात, विषय मांडतात. त्यामुळं मला इथल्या सगळ्या प्रश्नांची माहिती आहे. मला लोकांचे प्रश्न तोंडपाठ आहेत, असं अमित ठाकरे म्हणाले.
'माझे दरवाजे माहीमकरांसाठी कायम उघडे असतील. मी राजगडवर बसतो. मात्र माहीमसाठी खास दिवस ठेवणार आहे. मी इथेच राहतो. त्यामुळं इथले प्रश्न जाणून घेणं माझ्यासाठी कठीण नाही. ते सोडवणंही माझ्यासाठी कठीण नाही, असं अमित ठाकरे म्हणाले.
‘निसर्गानं दिलेला समुद्रकिनारा मला स्वच्छ करून द्यायचा आहे. मुंबईच्या किनाऱ्यांवर अनेकदा जावंसं वाटत नाही. मी बाहेरच्या देशातील किनाऱ्यावर गेलो आहे. तिथं गेल्यावर किती बरं वाटतं हे मला माहीत आहे. ते इथंही व्हायला हवं,’ असं अमित ठाकरे म्हणाले. मुंबईचा अर्धा समुद्रकिनारा आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात आहे याकडं लक्ष वेधलं असता, ‘तो बोलला तर तोही साफ करून देईन,’ अशी मिश्किल टिप्पणी अमित यांनी केली.
राज ठाकरे एखादी भूमिका घेतात, तेव्हा ती ठामपणे घेतात. त्यात उपकाराची भावना असते. समोरच्यानं त्याची परतफेड करावी अशी त्यांची इच्छा नसते. हे राजकारण आहे. समोरचे लोक कसे आहेत हे आपण ओळखलं पाहिजे, असं ते सांगतात. लोकसभेला त्यांनी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला. नारायण राणे व इतर लोकांचा प्रचार केला. त्यामागे परतफेडीची अपेक्षा नव्हती. प्रत्येकानं आपापलं राजकारण करावं असं त्यांचं म्हणणं असतं. माझंही तेच आहे, असं अमित ठाकरे म्हणाले.
निवडणुकीतील आव्हानाबाबत विचारलं असता अमित ठाकरे म्हणाले, 'माझ्या समोर कोणीही असो. शेवटी ही लढाई आहे. मी एकटा उभा राहून काय फायदा? माझ्यासाठी कुठलाही कॉम्प्रोमाइज करू नका असं मी स्वत: साहेबांना सांगितलं आहे. स्वबळावर म्हणजे स्वबळावर अशी आमची भूमिका आहे, असं अमित ठाकरे म्हणाले.
संबंधित बातम्या