Gudi Padwa : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवी मुंबईत हापूस आंब्याची मोठी आवक, दरात घसरण
hapus arrived in navi Mumbai : नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये प्रतिदिन ६० ते ६५हजार हापूस आंब्याच्या पेट्या येत आहेत. यामुळे दरात घसरण झाली आहे.
नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये हापूस आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या गुढीपाढव्याला अधिक आवक झाल्याने आंब्याचे दरही घसरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून प्रतिदिन ६० ते ६५ हजार हापूस आंब्याच्या पेट्या नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये येत आहेत. यामध्ये कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून ४५ हजार हापूस पेटी येत असून तामिळनाडू, कर्नाटक व आंध्रप्रदेशमधून १५ ते २० हजार पेट्या दाखल होत आहेत.
राज्यात अवकाळीचे संकट असले तरी कोकणात पाऊस झाला नाही, त्यामुळे आंबा उत्पादनावर याचा परिणाम झालेला नाही. या वर्षी मार्च महिन्यात मोठी आवक असल्याने एप्रिलमध्ये हापूसची आवक मंदावण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. आंब्याची आवक अधिक वाढल्याने दर सुद्धा कमी झालेले आहेत. पिकलेला हापूस आंबा ६०० ते १६०० रुपये डझन विकला जात असून हिरवा आंबा ४०० ते १ हजार रुपये दराने विकला जात आहे.
कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यातून गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत आंबा बागायतदार आपल्या हापूस व्यवसायाची सुरुवात करतात. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केल्यास हजारो हेक्टरवर आंबा बागा असून त्यातून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. कोकणाबरोबरच अन्य राज्यातील आंबाही नवी मुंबईत दाखल झाला आहे. त्यामुळे आंब्याचे दर सुद्धा कमी झाल्याने आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला आहे.