बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणावरून सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेते एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी करत उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी याप्रकरणी कोर्टात जाणार असल्याचं म्हटले आहे.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे म्हणाल्या की, जेव्हा अक्षय शिंदेकडून गोळी झाडली जाते तेव्हा ती पायावर झाडली जाते मात्र जेव्हा पोलीस गोळी झाडतात तेव्हा ती थेट डोक्यात लागते हे समजण्याच्यापलीकडचं आहे. या प्रकरणाची न्यायाधीशांच्या समितीकडून उच्चस्तरीय चौकशी व्हायला हवी. या प्रकरणाला राज्य सरकारच्या प्रभावापासून लांब ठेवले जावे असं त्यांनी मागणी केली.
अक्षय शिंदे कोणी संत किंवा समाजसुधारक नव्हता. त्याला फाशीच व्हायला हवी पण ती फाशी होताना लोकांच्या मनात कायद्याचा धाक आणि आदर कायम राहिला पाहिजे. अशा प्रकारामुळे कायद्याचा धाक रहात नाही. काल एन्काउंटर झाल्यावर लगेच एक पोस्टर व्हायरल झालं, न्याय असाच हवा, पोलिसाची टोपी आणि खाली धर्मवीर २ लिहिलं होते. चित्रपटाच्या लॉन्चिंगसाठी हे केले का? असा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी केला
पीडित मुलींना न्याय मिळाला पाहिजे. मात्र शाळा प्रशासनाला सोडून तुम्ही आरोपीला संपवलं आहे. यामुळे कोणाला तरी वाचवायचा प्रयत्न झाला आहे. जिथं सीसीटीव्ही नव्हते ती शाळा तुम्ही का वाचवताय? मी विरोधक म्हणून नव्हे तर आई आणि कायद्याची विद्यार्थिनी म्हणून बोलतेय.
अक्षय शिंदे याच्यावर गोळी झाडणारा संजय शिंदे हा पोलीस अधिकारी अनेक दिवस ठाण्याच्या हद्दीत ड्युटीला होता. त्यामुळे ठाण्यातून जे सत्ताकेंद्र चालते त्यावर आमचा अजिबात विश्वास नाही. त्यामुळे आमची मागणी आहे की, अशाप्रकारे एन्काउंटर झाले तर २४ तासांच्या आत याची सगळी माहिती मानवाधिकार कमिटीला गेली पाहिजे. या प्रकरणात हे झाले का? याप्रकरणी आपटेला अटक का झाली नाही? हे प्रश्न आम्ही कोर्टात मांडणार आहोत.
शिंदे याच्या एन्काऊंटरनंतर उज्ज्वल निकम यांनी तत्काळ प्रतिक्रिया दिली होती. यावर अंधारे यांनी निशाणा साधत म्हटले की, उज्जवल निकम सारख्या भाजपा प्रवक्त्याला या प्रकरणी बोलायची किती घाई झाली होती. त्यांनी म्हटले की, आरोपीला आपल्या गुन्ह्याचा पश्चाताप होत असतो व त्यातून असे कृत्य होते. अशाच प्रकारे अक्षय शिंदेने गोळी झाडून घेतली. काय तत्परता आहे भाजपाची? भाजपात गेल्यानंतर सदसदविवेक बुद्धी कशी गहाण पडते याचे उत्तम उदाहरण म्हणजे ज्या माणसाचा एन्काउंटर झालाय त्याला सुसाईड ठरवण्यासाठी जो माणूस हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात केसेस लढवतो, जो स्वत:ला वकील म्हणवतोते उज्ज्वल निकम घाईघाईने पुढे येतात.
संबंधित बातम्या