Akola Moneylender and Farmer News: अकोल्यात एका अवैद्य सावरकारने शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील मानबाडा गावात ही घटना घडली. सावकार शेळके बंधूंनी गावातील गटमाने कुटुंबाला कर्ज दिले. हे प्रकरण आता न्यायालयात आहे. दरम्यान, शेळके यांनी कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याचे शेत ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता गटमाने कुटुंबाने विरोध दर्शवला. यामुळे हा वाद पेटला. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर व्हिडिओ शेअर करून या घटनेचा निषेध केला.
विजय वडेट्टीवार यांनी अकोला येथील सावकाराच्या कृत्यामुळे राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, “सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणारा आणि मनाचा थरकाप उडवणारा प्रसंग. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात असलेल्या मनब्दा या गावी एका अवैध सावकाराच्या गुंडाणे शेतकऱ्यावर प्राणघात हल्ला करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. एवढ्यावरच हे गुंड थांबले नसून संबंधित शेतकऱ्याच्या शेतात जाऊन शेताचा ताबा घेण्याचासुद्धा प्रयत्न केला. शेतकरी आणि त्याच्या परिवाराने विरोध केला असता त्यांना ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न या गावगुंडातर्फे करण्यात आला. संबंधित शेतकऱ्याच्या म्हाताऱ्या वडीलाला व पत्नीलासुद्धा मारहाण करण्यात आली.”
पुढे विजय वडेट्टीवार म्हणाले की, "महायुती सरकारच्या काळात अवैध सावकारीने पुन्हा डोके वर काढले असून ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न अवैध सावकारांकडून होत आहे. शेतकऱ्यांचा सूड घेणाऱ्या अवैध सावकारांवर सरकारने कडक कारवाई करावी. अपघात -ड्रग्ज प्रकरणातील आरोपी, गुंड, भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या महायुती सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना छळणाऱ्या सावकारांसोबत तरी "सेटलमेंट" करू नये!"
याआधी विजय वडेट्टीवार यांनी नागपूर ड्रिंक आणि ड्राईव्ह प्रकरणावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. राज्यातील मोठ्या शहरांमध्ये ड्रग सहज उपलब्ध होत असल्याबाबत मुद्दा मागील अधिवेशनात आम्ही मांडला होता. वारंवार प्रश्न उपस्थित करून सरकारचे आणि गृह विभागाचे लक्ष याकडे वेधले. त्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचे आता दिसत आहे. कायदा आणि नियम फक्त सामान्य माणसांना छळण्यासाठी आहे ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.
संबंधित बातम्या