Ajit Pawar : ही शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक, सरकारच्या निर्णयावर अजित पवारांची टीका
एनडीआरएफचे निकष कालबाह्य झाले असल्याने सरकारने त्यांच्या निकषांच्या दुप्पट मदत जाहीर करुनही शेतकऱ्यांना जराही दिलासा मिळणार नसल्याचे अजित पवार म्हणाले.
मुंबई - अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे,अशा शेतकऱ्यांना हेक्टरची मर्यादा वाढवण्याबरोबरच एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुप्पट पैसे देण्याचा निर्णयआज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतघेण्यात आला. या निर्णयामुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १३ हजार ६०० रुपयांची भरपाई मिळणार आहे. मात्र सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी दिलासा नसून फसवा असल्याची टीका विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit pawar) यांनी केली आहे.
अजित पवार म्हणाले की,विदर्भ,मराठवाड्यासह राज्यातील अन्य जिल्ह्यात अतिवृष्टीने पिकांचं,घराचं,शेतजमिनींचं प्रचंड नुकसान झाले आहे. एनडीआरएफचे निकष कालबाह्य झाले असल्याने सरकारने त्यांच्या निकषांच्या दुप्पट मदत जाहीर करुनही शेतकऱ्यांना जराही दिलासा मिळणार नाही.
आज मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला,तो म्हणजे एनडीआरएफच्या मदतीपेक्षा दुप्पट मदत करण्याचा. मात्र,हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक केली असल्याची टीका अजित पवारांनी केली आहे.
शेतमजुरांनाही मदतीची गरज -
अजित पवार म्हणाले की, अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी ३ हेक्टर क्षेत्राची घातलेली मर्यादा अन्यायकारक असून यामुळे अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत. ही अट अधिक शिथील करण्याची गरज आहे. अतिवृष्टीकाळात शेतमजूरांचा रोजगार बुडाल्याने त्यांनाही मदत केली पाहिजे. घरातील भांडी, कपड्यांच्या नुकसानीसाठी प्रतिकुटुंब ३ हजार ८०० रुपये एनडीआरएफचा निकष आहे. तो दुप्पट करुन भागणार नाही. महाविकास आघाडी सरकारने भांडी, कपडे व अन्नधान्यासाठी प्रत्येकी ५ हजारांप्रमाणे प्रत्येक नुकसानग्रस्त कुटुंबाला १५ हजार रुपये दिले होते. पूर्ण पडलेल्या घरांसाठी दीड लाख रुपये तर, अंशत: नुकसानीसाठी सरसकट ५० हजारांची मदत दिली होती, असं अजित पवार म्हणाले.