विमान हवेत झेपावताच इंजिन झालं बंद, मुंबई विमानतळावर थरार
मुंबई विमानतळावरुन टाटांच्या मालकीचं एअर इंडियाचं विमान हवेत झेपावलं खरं. मात्र हवेत झेपावल्यावर विमानाचं इंजिन बंद पडल्याने काही काळ गोधळाचं वातावरण होतं
मुंबईचं विमानतळ सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक म्हणून ओळखलं जातं. शुक्रवारचा दिवसही याला काही अपवाद नव्हता. शुक्रवारीही मुंबईच्या विमानतळांवर विमानांची ये-जा पाहायला मिळत होती. अशात एअर इंडियाचं A320neo हे विमान रन वे वर आलं. सूचना मिळताच हे विमान प्रवाशांना घेऊन हवेतही झेपावलं. मात्र टेक ऑफ केल्यावर रिलॅक्स असणाऱ्या लोकांना मात्र एका वेगळ्याच चिंतेने ग्रासलं.
एअर इंडियाच्या A320neo या विमानानं हवेत झेप घेतली आणि त्याचा पुढचा थांबा होता, तो होता बंगळुरुचा. मात्र विमानाने हवेत उड्डाण केल्यावर अचानक विमानाचं इंजिन हवेतच काम करेनासं झालं. याची सूचना पायलटने सर्व प्रवाशांना दिली आणि मग प्रवाशांच्या चेहऱ्यावर एक अनामिक भीती पाहायला मिळाली.
विमानाचं एक इंजिन बंद झाल्याची बातमी पायलटकडून कळताच विमानात एकच हलकल्लोळ झाला. विमानातल्या एअर होस्टेसनी प्रवाशांना शांत केलं.
विमानाचं एक इंजिन बंद झाल्याची सूचना मुंबई विमानतळाला देण्यात आली. शक्य तितक्या लवकर विमानाला खाली उतरवणं गरजेचं होतं. २७ मिनिटात पुन्हा हे विमान मुंबई विमानतळावर उतरवण्यात आलं आणि प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला. या सर्व प्रवाशांना दुसऱ्या एका विमानानं मार्गस्थ करण्यात आलं.
सकाळी ९.४३ ते १०.१० पर्यंत हा थरार सुरु होता. आता हा प्रकार नेमका कसा घडला याबाबत चौकशी सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे.
विमानाच्या पायलटने विमानाने हवेत उड्डाण केल्यावर एका इंजिनाने हाय एक्झॉस्ट टेंप्रेचरची वॉर्निग दिली असं सांगितलं आहे.
काय म्हणाले एअर इंडियाचे प्रवक्ते?
या घटनेबाबत एअर इंडियाच्या प्रवक्त्यांना विचारले असता झालेल्या घटनेबद्दल एअर इंडिया गंभीर आहे असं ते म्हणालेत. एअर इंडिया सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देते, एअर इंडियाच्या A320neo विमानांमध्ये CFM लीप इंजिन बसवलेले आहेत. मात्र अशी घटना घडण्यामागे काय कारण आहे. याची चौकशी केली जाईल असंही एअर इंडियाच्या प्रवक्त्यांचं म्हणणं आहे. मंबई विमानतळावर घडलेल्या या घटनेच्या चौकशीतून लवकरच काहीतरी तथ्य बाहेर येईल असा अंदाज आहे.