Air India flight News: मोठ्या प्रतीक्षेनंतर मान्सून भारतात दाखल झाला आहे. पाऊस आणि खराब हवामानामुळे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानांच्या लँडिंग आणि टेक ऑफमध्ये अडचणी येत होत्या. रविवारी (२५ जून २०२३) अनेक विमानांचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. दरम्यान, एअर इंडियाच्या एआय-११२ विमानाने लंडनहून दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. खराब हवामनामुळे हे विमान दिल्लीच्या विमानतळावर उतरवण्यात आले नाही. पायलटने १० मिनिट वाट पाहिल्यानंतर विमान जयपूरच्या दिशेने वळवले. मात्र, त्यानंतर या विमानाच्या पायलटने ड्युटी संपल्याचे सांगत पुन्हा दिल्लीच्या दिेशेने उड्डाण करण्यास नकार दिला.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, एअर इंडियाचे विमान एआय-११२ रविवारी पहाटे ४ वाजता दिल्लीला पोहोचणार होते. परंतु, खराब हवामानामुळे या विमानाला जयपूरच्या दिशेने वळवण्यात आले. इमर्जन्सी लँडिंगनंतर सुमारे दोन तासांनंतर या विमानाला दिल्ली एअर ट्रॅफिक कंट्रोलकडून दिल्लीहून प्रवास पुन्हा सुरू करण्याची परवानगी मिळाली. पण आता पायलटने विमान उडवण्यास नकार दिला. यामागचे कारण ऐकून सर्वांनाच धक्का बसला. या पायलटने ड्युटी संपल्याची सांगत विमान उडवण्यास नकार दिला.
त्यामुळे विमानतळावर अडकलेल्या सुमारे ३५० प्रवाशांना दिल्लीला जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था शोधण्यास सांगण्यात आले. अशा स्थितीत काही प्रवासी रस्त्याने दिल्लीला रवाना झाले. दुसरीकडे क्रू बदलण्याची व्यवस्था झाल्यानंतर काही जण त्याच फ्लाइटने दिल्लीला रवाना झाले.
संबंधित बातम्या