मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Agni path: अग्नीपथ योजने अंतर्गत पुण्यात होणार भरती; २२ ऑगस्ट पासून प्रक्रिया सुरू

Agni path: अग्नीपथ योजने अंतर्गत पुण्यात होणार भरती; २२ ऑगस्ट पासून प्रक्रिया सुरू

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jul 19, 2022 07:34 PM IST

पुण्यात अग्नीपथ योजने अंतर्गत अग्निवीरांची भरती प्रक्रिया होणार आहे. २२ ऑगस्ट पासून या भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

Agni path
Agni path

पुणे: नुकत्याच सुरू झालेल्या अग्निपथ योजनेंतर्गत महाराष्ट्र, गुजरात, गोवा या राज्यांसाठी आणि दमण, दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशासाठी लष्कर भरती मोहीम २२ आॅगस्ट पासून सुरू होणार आहे. पुणे भर्ती क्षेत्र मुख्यालया अंतर्गत लष्करात जनरल ड्युटी (महिला लष्करी पोलिस) यासह एकूण आठ भरती मेळाव्यांचे आयोजन केले जाणार आहे, अशी माहिती लष्करातर्फे देण्यात आली आहे.

पहिल्या दोन लष्कर भरती या पुणे लष्कर भर्ती कार्यालय आणि औरंगाबाद अंतर्गत २२ आॅगस्ट रोजी होणार आहे. या मेळाव्यांसाठी नोंदणी सुरू आहे. याव्यतिरिक्त,लष्कर भरती कार्यालय मुंबई आणि नागपूर द्वारे देखील मेळाव्यासाठी नोंदणी सुरू आहे. या सोबतच लष्कर भर्ती कार्यालय कोल्हापूर, अहमदाबाद आणि जामनगरद्वारे देखील भर्ती मेळाव्यासाठी लवकरच नोंदणी सुरू होणार आहे. उमेदवारांना भारतीय लष्कराच्या संकेतस्थळावरून नोंदणी करणे आणि आॅनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.

अग्निवीर जनरल ड्युटी , अग्निवीर जनरल ड्यूटी (महिला लष्करी पोलीस), अग्निवीर लिपिक/भांडार व्यवस्थापक (स्टोअर कीपर) तांत्रिक , अग्निवीर कुशल कारागीर (ट्रेड्समन) या पदासाठी १०वी उत्तीर्ण आणि अग्निवीर कुशल कारागीर (ट्रेड्समन) ८ वी उत्तीर्ण या पदांसाठी भर्ती केली जाईल. संपूर्ण भरती प्रक्रिया नागरी प्रशासन आणि स्थानिक लष्करी आस्थापना (एलएमए) यांच्या समन्वयाने पार पाडली जात आहे. तपशीलवार नियोजन करण्यात आले असून त्यासाठी राज्य आणि जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक ते सहकार्य घेण्यात येत आहे.उमेदवारांनी सर्व आवश्यक मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रे, पुरेशा संख्येने छायाचित्रे, अधिसूचनेत दिलेल्या नमुन्यानुसार वैध प्रतिज्ञापत्र सोबत बाळगण्याचे आवाहन लष्करतर्फे करण्यात आले आहे.

कोणत्याही उमेदवाराला योग्यरित्या भरलेले प्रतिज्ञापत्र असल्याशिवाय मेळाव्यात प्रवेश दिला जाणार नाही. उमेदवारांनी त्यांच्या स्वत:च्या हितासाठी कोणत्याही तात्पुरत्या वैद्यकीय स्थितीबाबत वैद्यकीय पूर्व तपासणी करुन घ्यावी त्यामुळे तरुणांना भरती मेळाव्यामध्ये सहज सहभाग घेता येईल. संपूर्ण भर्ती प्रक्रिया अत्यंत नि:पक्ष आणि पारदर्शक आहे त्यामुळे दलालांना बळी न पडण्याचा सल्ला लष्करी अधिकाऱ्यांनी सर्व उमेदवारांना दिला आहे.कोणत्याही उमेदवाराशी कोणत्याही दलालाने संपर्क साधल्यास लष्करी अधिकारी/स्थानिक पोलिसांना कळवावे. कोणत्याही चौकशीसाठी उमेदवारांना त्यांच्या शंका www.joinindianarmy.nic.in वर मांडता येतील.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग