New Airports : महाराष्ट्रात दोन नव्या विमानतळांची मागणी; आदित्य ठाकरेंनी मोदी सरकारला लिहिलं पत्र
Aditya Thackeray : महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यात नवीन विमानतळं तयार करण्याची मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
Aditya Thackeray Letter To Jyotiraditya Scindia : महाराष्ट्रात आणखी दोन नवीन विमानतळाच्या मंजुरीसाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी थेट केंद्रातील मोदी सरकारला पत्र लिहिलं आहे. महाराष्ट्रात वाढत असलेल्या औद्योगिकीकरण आणि पर्यटन अशा दोन गोष्टींसाठी दोन स्वतंत्र विमानतळांची मागणी आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना केली आहे. त्यामुळं आता आदित्य ठाकरेंच्या पत्रावर केंद्र सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी काही दिवसांपूर्वी सादर केलेल्या बजेटमध्ये देशात नवीन ५० विमानतळं तयार करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रासाठी केंद्राकडे दोन विमानतळं मागितली आहे.
राज्यातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये विमानतळाची मागणी?
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पुढच्या काही वर्षांमध्ये तिसऱ्या विमानतळाची गरज भासणार आहे. नवी मुंबईतील विमानतळाचं काम पूर्ण झाल्यानंतर पालघरमध्ये एक नवीन विमानतळ बांधण्यात यावं, अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात नागरिकरण होत असून मोठ्या प्रमाणात औद्योगिक कंपन्या एमएमआर रिजनमध्ये आलेल्या आहेत. त्यामुळं नव्या विमानतळाला मंजुरी दिली तर त्यामुळं कपन्यांसहित लोकांना त्याचा फायदा होणार असल्याचंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
संभाजीनगरमध्ये आणखी एका विमानतळाची मागणी...
छत्रपती संभाजीनगरमध्ये चिकलठाणा विमानतळ आहे, परंतु जिल्ह्यातील वेरुळ आणि अजिंठा लेणीला भेट देण्यासाठी दरवर्षी जगभरातून लाखो लोक गर्दी करत असतात. त्यामुळं अजिंठा लेणीपासून जवळ असलेल्या फरदापूरमध्ये नवीन विमानतळास मंजुरी देण्याची मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली आहे. संभाजीनगरच्या चिकलठाणा विमानतळापासून अजिंठा लेणीचं अंतर तब्बल १६० किमी आहे. त्यामुळं पर्यटकांना मोठा प्रवास करावा लागतो. अजिंठ्यानजीक विमानतळ बांधला गेला तर पर्यटनाला चालना मिळेल, असंही आदित्य ठाकरे यांनी केंद्राला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.