Abdul Sattar Controversial Statement On Farmers : राज्यात सत्तांतर झाल्यापासून नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांमुळं चर्चेत असलेले कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करत नव्या वादाला तोंड फोडलं आहे. अवकाळी पावसामुळं संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारं वक्तव्य सत्तार यांनी केल्यामुळं आता त्यावरून राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातल्या नुकसानग्रस्त भागांची कृषिमंत्री सत्तार यांनी पाहणी केली, त्यानंतर बोलताना त्यांनी शेतकरी आत्महत्या हा काही आजचा विषय नाही, तर अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करत आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य सत्तार यांनी केलं आहे.
सोयगावातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा काही आजचा विषय नाहीये. राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करत असतात, असं वक्तव्य करत सत्तार यांनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे. माझ्या मतदारसंघात शेतकऱ्यांचं फार काही नुकसान झालेलं नाही. ज्या ठिकाणी काही प्रमाणात नुकसान झालेलं आहे, तिथं मी पंचानामा करून आलेलो आहे, असंही कृषिमंत्री सत्तार यांनी म्हटलं आहे. गेल्या आठवड्याभरापासून कृषिमंत्री सत्तार यांच्या सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात सात शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्यामुळं राज्यात शोक व्यक्त केला जात असतानाच आता कृषिमंत्री सत्तार यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळं राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. याशिवाय सत्तार यांच्या वक्तव्याचे राजकीय पडसाद विधीमंडळाच्या अधिवेशनातही पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शेतकऱ्यांप्रश्नी कृषिमंत्री असंवेदनशील- राष्ट्रवादी
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांबाबत बोलताना नेहमीच असंवेदनशीलपणा दाखवलेला आहे. शिंदे-फडणवीस सरकार शेतकऱ्यांप्रती उदासीन असून शेतकऱ्यांबद्दल सत्तारांची भाषा दिलासादायक नसल्याचं सांगत जयंत पाटील यांनी सत्तार यांच्यावर टीका केली आहे.
संबंधित बातम्या