Aaditya Thackeray : भाजपचे वरळीत शक्तिप्रदर्शन, शेलारांच्या दहीहंडीवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
निवडणुकांच्या तोंडावर भाजपकडून आदित्य ठाकरेंचे (Aadityathackeray) होम ग्राऊंड असणाऱ्या वरळी मतदारसंघात दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. यावर शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई – आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. या निवडणुकीसाठी भाजपने शिवसेनेचा सामना करण्यासाठी कंबर कसली आहे. भाजपकडून निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. निवडणुकांच्या तोंडावर भाजपकडून आदित्य ठाकरेंचे (Aaditya thackeray) होम ग्राऊंड असणाऱ्या वरळी मतदारसंघात दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत. यावर शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आदित्य ठाकरे (Aaditya thackeray) म्हणाले की, दहीहंडीमध्ये आम्ही राजकारण आणणार नाही. जांभोरी मैदानाचे सुशोभिकरण आम्ही केल्याने तिथे आम्ही दहीहंडी घेत नाही. वरळी आम्ही ए प्लस केली आहे, त्यामुळे अनेकांना वरळी आवडायला लागली आहे, असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला आहे.
आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असलेल्या वरळीमध्ये (Worli) भाजपकडून दही हंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या जवळचे मानले जाणारे संतोष पांडे यांनी या दहीहंडीचं आयोजन केलं आहे. जांभोरी मैदानात १९ तारखेला भाजपच्या दहीहंडीचं आयोजन करण्यात येणार आहे.
वरळीमधून शिवसेनेचे ३ आमदार आहेत, तरीही जांभोरी मैदान दहीहंडीसाठी घेण्यात भाजपला यश आलं आहे. वरळीमधून आदित्य ठाकरे, सुनिल शिंदे आणि सचिन अहिर हे तीन शिवसेनेचे आमदार आहेत.