Aaditya Thackeray on Maharashtra Karnataka dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील बेळगावात मराठी भाषकांचा महामेळावा महाराष्ट्र एकीकरण समितीकडून आयोजित करण्यात आला होता. या महामेळाव्यास राज्य सरकारचा विरोध असल्याने येथे पुन्हा एकदा महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक असा संघर्ष पेटला आहे. दरम्यान,या मुद्द्यावरून आमदार आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारकडे मोठी मागणी करत बेळगाव कारवार केंद्रशासित प्रदेश करण्याची मोठी मागणी केली आहे.
आदित्य ठाकरे यांनी बेळगाव-कारवारला केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे. बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीला मेळावा घेण्यापासून रोखण्यात आल्यानंतर ठाकरे गटाच्या आमदारांनी आजच्या अधिवेशनाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला.
आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित म्हटले आहे की,बेळगावात होत असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महाअधिवेशनाला कर्नाटक सरकारने परवानगी तर नाकारलीच, त्यावर बेळगावात संचारबंदीही लागू केली. सीमाही बंद केल्या जात आहेत. मराठी माणसांवरच्या या अन्यायाचा तीव्र निषेध!”
बेळगाव हा मराठी अस्मितेचा अविभाज्य भाग आहे आणि राहणारच! माझं कर्नाटकातल्या सरकारला आवाहन आहे की त्यांनी मराठी माणसांवरचा हा अन्याय तातडीने थांबवावा! महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हितापेक्षा मोठं काहीही नाही! आणि केंद्र सरकारकडे देखील मागणी आहे की हा सर्व विवादित भाग तातडीने केंद्रशासित करावा”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल मी आपले अभिनंदन. आपल्याला माहीत असल्याप्रमाणे बेळगाव आणि कारवारचा प्रश्न गंभीर होत आहे. या प्रश्नी मराठी माणसांना न्याय देणे किती गरजेचे आहे हे आपण जाणताच. बेळगाव कारवार प्रश्न बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे. मी आपणास कळकळीची विनंती करत आहे की बेळगाव कारवार प्रश्नी आपण मराठी माणसाला न्याव द्यावा.
आपण सभागृहामध्ये मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी बेळगाव कारवार हा केंद्रशासित प्रदेश करण्याचा ठराव घ्यावा, आम्ही एक मताने या ठरावास पाठिंबा देऊ. बेळगाव केंद्रशासित करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे लवकरात लवकर पाठवावा आणि बेळगाव केंद्रशासित करण्यासाठी प्रयत्न करावेत, ही विनंती.
संबंधित बातम्या