राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप होण्याची चिन्हे दिसत आहेत. उद्धव ठाकरे गट भाजपशी हातमिळवणी करू शकतो. अशी शक्यता शिंदे गटाकडून व्यक्त केली जात असतानाच आता ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरे आणि रश्मी उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याचा खळबळजनक दावा शिवसेनेचे प्रमुख प्रवक्ते आणि शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी केला आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना केसरकर म्हणाले की, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे काही दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले आहेत, असा खळबळजनक दावा केसरकर यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपला धोका दिल्याने त्यांना जवळ करायचे की नाही, हे पंतप्रधान मोदी ठरवतील. मात्र ठाकरे गट पुन्हा भाजपशी हातमिळवणी करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसत आहे.
केसरकर म्हणाले की, अंबानींच्या प्री-वेडिंग फंक्शनला जाताना रश्मी ठाकरे आणि अमृता फडणवीस एकाच विमानाने जामनगरला गेले होते. मात्र यात काही विशेष नाही, तो केवळ योगायोग होता. मात्र ठाकरे गट पुन्हा एकदा भाजपसोबत येण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे काही वृत्तपत्रात छापून आले आहे. या आधारावरच मी दावा करत आहे की, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी या वृत्ताचे खंडन केलेले नाही. त्यामुळे महाआघाडीत प्रवेश करण्यापूर्वी प्रकाश आंबेडकरांनी विचारलेला प्रश्न योग्य आहे. तुम्ही पुन्हा भाजपसोबत जाणार नाही, याची गॅरंटी काय? हा ठाकरे गटाला केलेला आंबेडकरांचा प्रश्न योग्यच आहे.
संबंधित बातम्या