Mumbai Crime news : मुंबईत घाटकोपर येथे एका पती पत्नीचा होळीच्या दिवशी संशयास्पद मृत्यू झाला होता. दोघांचेही मृतदेह हे नग्नावस्थेत आढळले होते. या घटनेला एक वर्ष उलटूनही अद्याप त्यांचा मृत्यू नेमका असा झाला याचा उलगडा झालेला नाही. या गुन्हाच्या तपास करणाऱ्या वैद्यकीय पथकाला देखील दोघांचा मृत्यू नेमका कसा झाला याचा निष्कर्ष काढता आलेला नाही.
मुंबईत घाटकोपर येथे दीपक शहा (वय ४४) आणि त्यांची पत्नी टीना शहा (वय ३८) यांचे गेल्या वर्षी ८ मार्च रोजी घाटकोपर येथील कुकरेजा पॅलेस इमारतीतील वल्लभबाग लेनमधील त्यांच्या भाड्याच्या अपार्टमेंटमधील बाथरूममध्ये नग्न अवस्थेत मृतदेह आढळले होते. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला याचा अंदाज पोलिस बांधत होते. प्राथमिक तपसात भांग किंवा अतिमद्य सेवनाने त्यांचा मृत्यू झाला असावा किंवा गिझरमधून गॅस गळती होऊन त्यांच्या मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र, महानगर गॅस लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी गॅस गळतीचा दावा फेटाळून लावला.
यानंतर फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) आणि हिस्टोपॅथॉलॉजिस्टने त्यांच्या मृतदेहाचा व्हीसेराय तपासला यात त्यांनी दोघांचा मृत्यू हा विषबाधा झाल्याने झाला असावा ही शक्यता नाकारली, पंत नगर पोलिसांना जेजे हॉस्पिटलकडून अंतिम अहवाल मागवला. "केमिकल ॲनालिसिस रिपोर्ट, व्हिसेरा आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट जेजे हॉस्पिटलकडे सध्या आहेत. जेजे हॉस्पिटलमधील डॉक्टर्स बोर्ड गेल्या एक वर्षापासून या प्रकरणाचा अभ्यास करत आहेत. परंतु या पती पत्नीचा मृत्यू नेमका कसा झाला याचे कोणतेही ठोस पुरावे सापडले नाहीत. या घटनेला आता वर्ष होत असून तपासाला देखील विलंब होत आहे. मृत्यूचे कारण निश्चित करण्यात रुग्णालयाल अनेक स्मरणपत्रे देण्यात आली असून त्यांनी या जोडप्याच्या मृत्यूचे कोणतेही अंतिम कारण दिलेले नाही, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.
८ मार्च २०२३ रोजी हे पती पत्नी दुपारी ३.३० पर्यंत विलेपार्ले येथे मित्रांसोबत होळी साजरी करून दुपारी ४.३० वाजता हे जोडपे घरी परतले. पोस्टमॉर्टममध्ये असे म्हटले आहे की, घरी परतल्यानंतर लगेचच या जोडप्याचा मृत्यू झाला. मात्र, दुसऱ्या दिवशी दाम्पत्याच्या मोलकरण ही घरी काम करण्यासाठी त्याच्या घरी गेल्यावर त्यांच्या मृत्यू झाल्याचे उघड झाले.
पोलिस अधिका-यांनी सुरवातीला त्यांचा मृत्यू हा श्वास कोंडल्याने झाला असावा असा अंदाज वर्तवला होता. मात्र, हे कारण देखील नाकारण्यात आले. यानंतर विषबाधा झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा असे गृहितक मंडणले गेले. मृत्यूपूर्वी या जोडप्याने होळी साजरी केली होती. ज्यामुळे त्यांचा व्हिसेरा, रक्ताचे नमुने आणि मृतदेहाजवळ सापडलेल्या त्यांच्या उलट्यांच्या नामुम्यांचे विश्लेषण करण्यात आले. हे नमुने सविस्तर फॉरेन्सिक तपासणीसाठी एफएसएलकडे पाठवण्यात आले आहेत. ऑगस्ट २०२३ मध्ये, FSL च्या अहवालात विषबाधा होण्याची शक्यता नाकारण्यात आली, कारण ज्यामुळे विषबाधा होऊ शकते, असे कोणतेही नमुने तपासणीत आढळले नाही.
संबंधित बातम्या