Thane Pot holes : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात खड्ड्यांचा आणखी एक बळी; दोन महिन्यात सात जणांनी जीव गमावला
Boy died due to pot holes in Thane : मुख्यमंत्र्याच्या ठाण्यात खड्ड्यांमुळे गेल्या दोन महिन्यात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी देखील दिवा येथील आगसन येथे खड्डा चुकवण्याच्या नादात युवकाचा टँकर खाली चिरडून मृत्यू झाला.
ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्याच्या वाहतूक कोंडीत अडकल्यावर तातडीने नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. मात्र, त्यांच्या मतदार संघ असेलेल्या ठाण्यातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे सामान्य नागरिकांचे जिव जात असतानाही कुठल्याही उपाय योजना होताना दिसत नाहीत. रविवारी रात्री दिवा येथील आगसन या ठिकाणी दुचाकीस्वार तरुणाचा खड्डे चुकवण्याच्या नादात एका टँकर खाली येऊन चिरडल्याने त्याचा मृत्यू झाला. गेल्या महिन्यात खड्ड्यांनी घेतलेला हा ७ वा बळी आहे. तरुणाच्या मृत्यू नंतर स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत.
गणेश पाले (वय २२) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातानंतर दिवा ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. त्यांनी प्रशानाच्या भोंगळ कारभारावर टीका केली आहे. आता पर्यन्त ७ जणांचा मृत्यू होऊनही प्रशासनाने कुठलीच कारवाई केलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश पाले हा दिव्यतील आगासन येथील ओमकारनगर येथे राहत होता. तो कामानिमित्त बाहेर गेला असता होता. सततच्या पावसामुळे आगासन- दिवा रस्त्या नादुरुस्त झाला आहे. या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहे. गणेश हा याच रस्त्याने रात्री ८ च्या सुमारास जात होता. यावेळी अचानक समोर मोठा खड्डा आल्याने तो चुकवितांना त्यांचे दुचकीवरील नियंत्रण सुटले आणि तो खाली पडला. याच वेळी समोरून येणाऱ्या एका टँकरखाली तो आल्याने त्याचा चिरडून जागीच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. यातूनच खड्डा चुकवितांना त्याच्या मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट झाले. स्थानिक नागरिकांनी त्याला दवाखान्यात नेले. मात्र, उपचारपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर टँकर चालक फरार झाला आहे.
दरम्यान या अपघाता बाबत मनसे आमदार प्रमोद पाटील यांनी देखील राज्य सरकारवर टीका केली आहे. पाटील म्हणाले. ठाण्यासाठी मोठ्या निधीच्या घोषणा केल्या जातात. मात्र, याच ठाण्यातील दिवा परिसर हा विकासापासून वंचित आहेत. आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याचे आहेत. असे असूनही दिवा-आगासन रस्त्याच्या मागचे नादुरुस्तहीचे शुक्लकाष्ठ संपताना दिसत नाही.
या अपघाताबाबत ठाणे महानगर पालिकेचे नगर अभियंता यांनी भलतेच उत्तर दिले आहे. नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा म्हणाले, आगसण दिवा रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र, स्थानिकांच्या जागेच्या वादातून ४०० मीटर रस्त्याचे काम रखडले आहे. याच अंतराच्या मधोमध हा अपघात झाला आहे. आम्ही याची दखल घेतली असून खड्डे बुजवण्याचे काम हे सुरूच राहणार आहे.
गेल्या दोन महिन्यात सात जणांचा मृत्यू
कल्याण येथील म्हारळ-वरप येथे नारायण भोईर (वय ६५) या वृद्धचा गडीवरून जात असताना खड्डा चुकविताना मृत्यू झाला. ही घटना २ जुलै रोजी घडिली. तर या घटनेनंतर दोन दिवसांनी ५ जुलैला घोडबंदर येथील काजूपाडा भागात खड्डा चुकविताना एसटीखाली चिरडून मोहसीन खान यांचा नगरिकाचा मृत्यू झाला. कल्याण -बदलापूर मार्गावर अंकित थविया (वय २६) या तरुणीचा १६ जुलै रोजी खड्डयामुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने मृत्यू झाला. मुंबई- नाशिक महामार्गावरील रांजनोली नाका येथे ब्रिजेशकुमार जैस्वार यांची दुचाकी खड्डय़ात गेल्याने ते रस्त्यावर कोसळून पाठीमागून येणाऱ्या डम्परखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना २६ जुलै रोजी घडली. नदीनाका पुलावर खड्डय़ामुळे दुचाकीचा वेग कमी केल्याने मागून ट्रकने दिलेल्या धडकेत अशोक काबाडी (वय ६५) यांचा ७ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. तर रविवारी (दि २८) आगासन -दिवा मार्गावर खड्डे चुकविताना तोल जाऊन टँकरच्या चाकाखाली आल्याने गणेश पाले या तरुणाचा मृत्यू झाला.