Man Died in Mumbai Due to eat chicken shawarma: मुंबई एक धक्कादायक घटना घडली आहे. रस्त्याशेजारी लागणाऱ्या खाद्य पदार्थांच्या गाड्यांवर चिकन शॉर्मा खाल्ल्याने एकाचा मृत्यू तर काही जणांना विषबाधा झाली आहे. ही घटना मानखुर्द येथे घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून विषबाधा प्रकरणाला कारणीभूत ठरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे.
प्रथमेश विनोद घोक्षे (वय १९) असे विषबाधा झाल्यामुळे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर इतर काही जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आनंद कांबळे आणि मोहम्मद अहमद रेजा शेख यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मानखुर्द येथील महाराष्ट्र नगर येथील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे खाद्य पदार्थांचे स्टॉल आहेत. या ठिकाणी परवानगी नसतांना खाद्य पदार्थांची विक्री केली जात असते.
येथील आनंद कांबळे व मोहम्मद अहमद रेजा शेख यांच्या चिकन शॉर्माच्या स्टॉलवर प्रथमेश तसेच येथे राहणाऱ्या काही नागरिकांनी चिकन शॉर्मा खाल्ला. हा चिकन शॉर्मा खालल्यामुळे प्रथमेशला विषबाधा झाली. त्याला अचानक उलटी आणि पोटदुखीचा त्रास झाला. त्याला केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, आणखी काही जणांना याच गाडीवरुन शॉर्मा खाल्ल्याने विषबाधा झाल्याची माहिती पोलिसांना मिळू लागली. तब्बल १० ते १२ जणांना त्रास होऊ लागला. यामुळे नागरिक दवाखान्यात उपचारासाठी गेले. दरम्यान, प्रथमेशची प्रकृती खालावल्याने त्याचा मृत्यू झाला. तर गंभीर आजारी असणाऱ्या इतर चौघांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या प्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी निकृष्ट शॉर्मा विकणाऱ्या आनंद कांबळे व मोहम्मद अहमद रेजा शेख या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे मुंबई येथे रस्त्यावर मिळणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या खाद्य पदार्थांच्या विक्रीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नागपूरमधील रेल्वेच्या स्टॉलवरील बिर्याणी खाल्ल्यामुळे यशवंतपूर एक्स्प्रेसमधील ४० प्रवाशांना विषबाधा झाली होती. ही घटना गेल्या आठवड्यात घडली होती. यशवंतपूरवरून निघालेली ही गाडी गोरखपूरकडे जात होती. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील बल्लारशा स्थानकावर जनआहारमधून या गाडीत अंडा बिर्याणीचे दोनशे पार्सल पाठविण्यात आले होते. नागपूरच्या जनआहार स्टॉलवरुनही काही पार्सल या गाडीत पाठवण्यात आले होते. यातून ४० प्रवाशांना विषबाधा झाली होती, या घटनेमुळे खळबळ उडाली होती.
संबंधित बातम्या