NMMC Election 2022 : ठाण्यातील १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश; शिंदे सरकारचा मोठा निर्णय
CM Eknath Shinde : ठाणे तालुक्यातील १४ गावांचा समावेश नवी मुंबई महापालिकेत करण्याबाबतची अधिसूचना नगरविकास विभागानं काढली आहे.
Navi Mumbai Municipal Corporation : ठाणे तालुक्यातील १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार सोमवारी नगरविकास विभागामार्फत त्याबाबत प्राथमिक अधिसूचना काढण्यात आली आहे. हद्दवाढीच्या या कार्यवाहीमुळं ठाणे तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका डिसेंबर २०२२ पर्यंत पुढे ढकलण्याची विनंती नगरविकास विभागानं राज्य निवडणूक आयोगाकडं केली आहे.
ठाणे जिल्ह्यातील दहिसर, मोकाशी, वालीवली, पिंपरी, निघू, नावाळी, वाकळण, बामाली, नारीवली, बाळे, नागाव, भंडाली, उत्तरशिव आणि गोटेघर या १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. याबाबत आता नगरविकास विभागानं अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगानं जानेवारी २०२१ ते मे २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या राज्यातील ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यात ठाणे तालुक्यातील या १४ गावांचाही समावेश आहे. परंतु आता या गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश करण्याची कार्यवाही सुरू असताना राज्य निवडणूक आयोग या गावातील निवडणुका रद्द करणार की कायम ठेवणार, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे.
निवडणूक आयोगाच्या जाहिर कार्यक्रमानुसार या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूका झाल्या आणि त्यानंतर हद्दवाढीची कार्यवाही झाल्यास ग्रामपंचायतींचं अस्तित्व संपुष्टात येईल. त्यानंतर नव्यानं स्थापित नागरी प्राधिकरणांच्या निवडणूका घ्याव्या लागतील. परिणामी निवडणूकीवर दुहेरी खर्च होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळंच आता ठाणे तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका डिसेंबर २०२२ पर्यंत पुढे ढकलण्याची विनंती शिंदे सरकारनं राज्य निवडणूक आयोगाला केली आहे. यासंदर्भात नगरविकास विभागाचे उपसचिव कैलास बधान यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवांना पत्र पाठवलं आहे.