Uttarakhand Rain: मुसळधार पावसामुळे केदारनाथ यात्रा स्थगित, आतापर्यंत १४ मृत्युची नोंद, १० जखमी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Uttarakhand Rain: मुसळधार पावसामुळे केदारनाथ यात्रा स्थगित, आतापर्यंत १४ मृत्युची नोंद, १० जखमी

Uttarakhand Rain: मुसळधार पावसामुळे केदारनाथ यात्रा स्थगित, आतापर्यंत १४ मृत्युची नोंद, १० जखमी

Aug 02, 2024 06:41 AM IST

Kedarnath Yatra halted: उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे दारनाथ यात्रा स्थगित करण्यात आली. या पावसामुळे आतापर्यंत १४ मृत्युंची नोंद करण्यात आली आहे. तर, १० जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

मुसळधार पावसामुळे केदारनाथ यात्रा स्थगित
मुसळधार पावसामुळे केदारनाथ यात्रा स्थगित

Heavy Rains in Uttarakhand: उत्तराखंडमध्ये अनेक नद्यांना पूर आल्याने रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर स्थिती निर्माण झाली असून घर कोसळून १४ जणांचा मृत्यू झाला असून१० जण जखमी झाले आहेत. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याने खराब हवामानात केदारनाथ यात्रा स्थगित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. घोरापरव, लिंचोली, बडी लिंचोली आणि भिंबळी येथे दगडांनी हा मार्ग बंद आहे.

उत्तराखंड सरकारने एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कार्यालयाने परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर केंद्राने राज्यातील बचाव कार्यात मदत करण्यासाठी भारतीय हवाई दलाची दोन हेलिकॉप्टर, एक चिनूक आणि एक एमआय १७ पाठविली आहे.

तीन विमान इंधनाचे टँकरही पाठविण्यात आले असून, पंतप्रधान कार्यालयाने मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांना आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही परिस्थितीचा आढावा घेतला. येथील राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, हल्द्वानी येथील पुराच्या नाल्यात एक मूल वाहून गेले. त्याचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.

बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे गौरीकुंड-केदारनाथ ट्रेक मार्गावरील भिंबली येथे डोंगरावरून मोठे दगड खाली येऊन रस्ता बंद झाल्याने रस्ता वाहून गेला. आतापर्यंत लिंचोली आणि भीमबली येथून हेलिकॉप्टरने ४२५ यात्रेकरूंना सुरक्षित स्थळी आणण्यात आले आहे, तर बचाव पथकांच्या मदतीने ११०० भाविक विविध ठिकाणांहून पायी सोनप्रयागयेथे पोहोचले आहेत.

डेहराडूनमध्ये चार, हरिद्वारमध्ये सहा, टिहरीमध्ये तीन आणि चमोलीमध्ये एक अशा एकूण १४ जणांचा बुधवारी सायंकाळपासून पावसामुळे मृत्यू झाला आहे. डेहराडूनचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक अजय सिंह यांनी सांगितले की, रायपूर भागात कालव्यात बुडून दोघांचा मृत्यू झाला. मृतदेह सापडल्याचे त्यांनी सांगितले. सुंदर सिंग आणि अर्जुन सिंग राणा अशी मृतांची नावे आहेत.

डेहराडूनमधील आणखी एका घटनेत सहस्रधारा पार्किंगजवळ नदीत आंघोळ करताना दोन जण वाहून गेल्याची घटना गुरुवारी घडली. माहिती मिळताच एसडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले, मात्र तोपर्यंत स्थानिकांना एक मृतदेह सापडला होता. त्यानंतर एसडीआरएफने नदीतून दुसरा मृतदेह बाहेर काढला. इंद्रपाल (वय ४०) आणि भूपेंद्रसिंह राणा (वय ४३) अशी मृतांची नावे आहेत.

हरिद्वार जिल्ह्यातील रुरकी भागातील भारपूर गावात मुसळधार पावसामुळे एक घर कोसळून चार जणांचा मृत्यू झाला, तर दहा जण जखमी झाले. त्यापैकी आठ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसऱ्या घटनेत बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास रुरकी बसस्थानकावर विजेचा धक्का लागून दोघांचा मृत्यू झाला. टिहरी जिल्ह्यातील घनसाली भागातील जखन्याली गावात ढगफुटीनंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या रेस्टॉरंटचे दरड कोसळून झालेल्या भूस्खलनात भानू प्रसाद (५०), त्यांची पत्नी नीलम देवी (४५) आणि मुलगा विपिन (२८) या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला.

टिहरीचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ब्रिजेश भट्ट यांनी सांगितले की, विपिनला वाचविण्यात आले, परंतु ऋषिकेशयेथील एम्समध्ये नेत असताना त्याचा मृत्यू झाला. चमोली जिल्ह्यातील गैरसैन तालुक्यातील कुंखेत गावात डोंगराचा ढिगारा एका घरावर कोसळून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. नैनीताल जिल्ह्यातील हल्द्वानी येथे एक सात वर्षांचा मुलगा पुराच्या नाल्यात वाहून गेला. पोलीस आणि एसडीआरएफ त्याचा शोध घेत आहेत.

हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, डेहराडूनमध्ये बुधवारपासून १७२ मिमी, हरिद्वारच्या रोशनाबादमध्ये २१० मिमी, रायवाला १६३ मिमी, हल्द्वानी १४० मिमी, रुरकी ११२ मिमी, नरेंद्र नगर १०७ मिमी, धनोल्टी ९८ मिमी, चकराता ९२ मिमी आणि नैनीताल ८९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

मुख्यमंत्री धामी यांनी अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. धामी यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, बुधवारी रात्री राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याची माहिती मिळाली असून बचाव पथकांनी रात्रभर ऑपरेशन राबवून लोकांना सुरक्षित स्थळी नेले.

धामी यांनी येथील राज्य आपत्कालीन कार्य केंद्रात जाऊन पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि आपत्ती व्यवस्थापन सचिव विनोदकुमार सुमन यांना जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय राखण्याचे निर्देश दिले. दरम्यान, रुद्रप्रयागयेथे पोहोचलेल्या केदारनाथला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी एक सल्ला जारी करण्यात आला आहे, ज्यात हवामानात सुधारणा आणि बंद पडलेले आणि तुटलेले रस्ते पूर्ववत करण्याबाबत अधिकृतपणे माहिती मिळेपर्यंत ते जिथे आहेत तिथेच थांबण्यास सांगितले आहे. रुद्रप्रयाग जिल्ह्यातील मंदाकिनी आणि अलकनंदा या दोन्ही नद्या धोक्याच्या पातळीच्या जवळ वाहत आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर