World Food Safety Day 2024 tips in marathi: आपण जे अन्न खातो, त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर आणि मनावर होतो. गेल्या दोन दशकात आपल्या खाण्याच्या सवयी खूप बदलल्या आहेत. फास्ट फूड, पॅकेज फूड आणि जंक फूडचा ट्रेंड झपाट्याने वाढत चालला आहे. अन्न साठवून ठेवण्यासाठी घराघरांत रेफ्रिजरेटरचा वापर केला जात आहे. फळे, भाजीपाला आणि पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी खते आणि औषधांचा वापर केला जात आहे. अशा परिस्थितीत स्वतःसाठी निरोगी आणि सुरक्षित अन्न निवडणे, हे मोठे आव्हान आहे. या संदर्भात, जागतिक आरोग्य संघटनेद्वारे दरवर्षी ७ जून रोजी ‘जागतिक अन्न सुरक्षा दिन’ साजरा केला जातो. दूषित अन्नाबद्दल लोकांना जागरूक करणे, हा त्याचा उद्देश आहे. आज या दिवसाच्या निमित्ताने आपण अन्न सुरक्षेचे महत्त्व आणि गरज याबद्दल जाणून घेणार घेऊया...
अन्न ही आपल्या शरीराची मूलभूत गरज आहे. जिवंत आणि निरोगी राहण्यासाठी, पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अन्न. अन्न आपल्या सर्वांच्या शारीरिक आणि मानसिक विकासाशी निगडीत आहे. आपण खात असलेले अन्न सुरक्षित असेल, तरच ते आपल्या शरीराचे पोषण करेल आणि आपल्याला रोगांपासून मुक्त करू शकेल. दरवर्षी १० पैकी १ माणूस दुषित अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे आजारी पडतो. जगभरात १६ लाखांहून अधिक लोक खराब अन्नपदार्थांमुळे आजारी पडतात. दुषित पदार्थांमुळे २००हून अधिक आजार होतात. जगभरात दररोज ५ वर्षांहून कमी वयाची सरासरी ३४० बालकं दुषित अन्नपदार्थांमुळे होणाऱ्या आजारामुळे मृत्यूमुखी पडतात. दुषित पदार्थांमुळे डायरियापासून ते कॅन्सरसारखे अनेक गंभीर आजार होऊ शकतात.
अन्न तयार करणे, ते शिजवून अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी आणि नंतर ते पॅकेटच्या स्वरूपात तयार करण्यासाठीच्या या प्रक्रियेमध्ये अन्न हे अनेक टप्प्यांतून जाते. कोणत्याही खाद्यपदार्थाचे शेल्फ लाइफ फार मोठे नसते. तुम्ही फळे, भाज्या किंवा शिजवलेले अन्न जास्त काळ ठेवू शकत नाही. त्याचे नीट पॅकेजिंग न केल्यास ते खराब होते. अन्न खराब होणे म्हणजे त्यात बॅक्टेरिया, विषाणू आणि बुरशीजन्य घटक वाढतात. याशिवाय अन्न दूषित होण्याची इतरही अनेक कारणे असू शकतात. जसे की, अन्न उत्पादनादरम्यान त्यात विषारी रसायने आणि औषधे वापरणे किंवा त्यांचे शेल्फ लाइफ वाढवण्यासाठी पॅकेजिंग दरम्यान संरक्षकांचा अतिवापर करणे. याशिवाय अन्नामध्ये बॅक्टेरिया किंवा विषाणू वाढण्याची अनेक कारणे असू शकतात. स्वयंपाक करण्यापूर्वी हात न धुणे, चॉपिंग बोर्ड, स्वयंपाकाची भांडी नीट साफ न करणे, अन्न तासन् तास उघडे ठेवणे, स्वयंपाकघरात स्वच्छतेची काळजी न घेणे ही कारणे देखील असू शकतात.
दूषित अन्नामुळे अनेक रोग आणि संसर्ग होण्याचा धोका असतो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, दूषित अन्नामुळे २०० प्रकारचे विविध घातक संक्रमण आणि रोग होऊ शकतात. दुषित अन्नपदार्थांमुळे उलट्या, डायरिया, टायफॉईड, मळमळ, अन्नविषबाधा, काविळ असे अनेक आजार होऊ शकतात. ६५ वर्षांवरील वृद्ध, ५ वर्षांपेक्षा कमी वयाची मुले, गर्भवती महिला किंवा कोणत्याही आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना याचा धोका जास्त असतो. कारण त्यांची प्रतिकारशक्ती सर्वात कमकुवत आहे.
दूषित अन्नामुळे होणारे आजार टाळण्यासाठी स्वच्छता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही स्ट्रीट फूड, फास्ट फूड किंवा बाजारातील जंक फूड खात असाल, तर तिथे स्वच्छतेची काळजी घेतली गेली आहे की, नाही हे पाहा. तसेच, अन्न ताजे आहे की, नाही ते तपासून बघा. खराब आणि शिळ्या अन्नामध्ये बॅक्टेरिया आणि जंतू निर्माण होण्याचा धोका अनेक पटींनी जास्त असतो. याशिवाय मांस, कोंबडी, अंडी, मासे, कच्ची फळे आणि भाज्या खरेदी करतानाही विशेष काळजी घ्यावी. बराच वेळ बाहेर ठेवलेले अन्न खाऊ नये. फळ-भाज्या खाण्यापूर्वी त्या स्वच्छ धुवून घ्या. फळे आणि भाज्या स्वच्छ करण्यासाठी फक्त स्वच्छ पाणी वापरा.
संबंधित बातम्या