Unknown Facts About Stale Food : अन्न नेहमी जेवढं खाल्लं जाईल, तितकंच शिजवाव, असं म्हटलं जातं. आयुर्वेद असो वा आधुनिक विज्ञान, अन्न नेहमी ताजे आणि लगेच शिजवून खावे, यावर दोघांचेही एकमत आहे. शिळे अन्न फ्रिजमध्ये ठेवून किंवा पुन्हा गरम केल्याने त्यातील पोषक तत्वे ही कमी होतात आणि चव खराब होते. मात्र, काही खाद्यपदार्थ असे असतात, जे शिळे झाल्यानंतर अधिकच चविष्ट आणि पौष्टिक होतात. यातील अनेक पदार्थ खास शिळे शिल्लक राहिलेल्या पदार्थांपासून बनवले जातात, जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. चला तर मग आज जाणून घेऊया अशा पदार्थांबद्दल...
अनेकदा घरातील मोठ्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी चहाबरोबर रात्रीची उरलेली पोळी खायला आवडते. जर तुमच्याकडेही पोळीही रात्री शिल्लक राहिली असेल, तर ती गरम करून खाणे खूप फायदेशीर ठरू शकते. शिळ्या चपातीमध्ये फरमेंटेशन प्रक्रिया सुरू होते, जी आतड्याच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामुळे पचन सुधारते आणि मधुमेह व्यवस्थापनासाठी देखील हा एक निरोगी पर्याय आहे.
रात्रीचा शिल्लक राहिलेला शिळा भातही दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत अधिकच पौष्टिक लागतो. भारतातील अनेक राज्यांमध्ये शिळा भात नाश्त्यात खाल्ला जातो. शिजवलेला भात रात्रभर पाण्यात भिजवून ठेवला जातो. मग सकाळी त्यात कांदा, मीठ, मिरची घालून तो खाल्ला जातो. हा पदार्थ पांता भात आणि बासी भात या नावाने ओळखला जातो. हा भात पोटासाठी खूप फायदेशीर असतो. याव्यतिरिक्त लोह, सोडियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम सारखे अनेक पोषक घटक देखील यात मुबलक प्रमाणात असतात.
भारतीय घरांमध्ये जेवणानंतर काहीतरी गोड खाण्याची प्रथा आहे. यासाठी प्रामुख्याने तांदळाची खीर बनवली जातो. ही खीर खायला खूप चविष्ट असते. पण, तुम्ही कधी रात्रीची शिल्लक राहिलेली शिळी खीर खाल्ली आहे का? शिळी खीर चविष्ट तर असतेच, पण आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. उरलेली खीर थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा, मग दुसऱ्या दिवशी त्याचा आस्वाद घ्या. थंड खीर रबडीसारखी चवदार होईल आणि आपल्या आतड्याच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरेल.
एक-दोन दिवस ठेवलेले दही शिळे झाल्यावर अधिक फायदेशीर ठरते. यामध्ये फरमेंटेशन प्रक्रिया वेगाने होते आणि चांगल्या जीवाणूंची वाढ देखील सुरू होते. या प्रकारचे दही आतड्याच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ही पचनक्रिया सुधारण्याबरोबरच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासही मदत करते. शिळेपणामुळे दह्यामधील अनेक जीवनसत्त्वांचे प्रमाण लक्षणीय रीतीने वाढते, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. ज्यांना दूध किंवा दही पचत नाही त्यांच्यासाठी शिळे दही हा एक चांगला पर्याय असू शकतो.
फक्त भातच नाही तर, राजमा ही शिळा झाल्यावर अधिकच हेल्दी होतो. राजमा रात्रभर ठेवला की सर्व मसाले आणि राजमा एकत्र चांगले मिसळतात. यामुळे चवही लक्षणीय वाढते. राजमामध्ये प्रथिने, फायबर, लोह आणि पोटॅशियम सारखे अनेक पोषक घटक असतात.
संबंधित बातम्या