Side Effects of Brinjal During Pregnancy: आई होणे हे प्रत्येक स्त्रीचे स्वप्न असते. आईपणाची भावनाच प्रचंड सुखावणारी असते. महिलांच्या प्रेग्नन्सीत ती महिलाच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य बदलत असते. याकाळात लहान-लहान गोष्टींमध्येदेखील महिलांना काळजी घेणे आवश्यक असते. गरोदरपणात गरोदर महिलांनी आपल्या खाण्यापिण्याची सवयींमध्ये विशेष काळजी घेणे गरजेचे असते. स्त्रीच्या आहाराचा थेट परिणाम तिच्या गर्भात वाढणाऱ्या नवजात अर्भकाच्या विकासावर होतो. म्हणूनच आयुर्वेदानुसार गरोदर महिलांनाही आहाराशी संबंधित काही नियम पाळण्याचा सल्ला दिला जातो. ज्याकडे दुर्लक्ष केल्यास केवळ होणाऱ्या आईच्याच नव्हे तर तिच्या गर्भात वाढत असलेल्या नवजात बाळाच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होऊ शकतो.
आहाराशी संबंधित असाच एक नियम सांगतो की, गरोदर महिलांनी वांगीचे सेवन करू नये. खरं तर गरोदरपणात स्त्रियांना अनेक शारीरिक आणि मानसिक बदलांना सामोरं जावं लागतं. अशावेळी वांगीचा अतिवापर केल्यास त्यांच्यावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. वांगीमध्ये असलेल्या फायबर, फॉलिक अॅसिड आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने गर्भाच्या विकासास मदत होते, परंतु जर या भाजीचे जास्त प्रमाणात सेवन केले तर यामुळे गर्भपात होण्याचा धोकाही वाढू शकतो असे मानले जाते. जाणून घेऊया गरोदरपणात वांगी खाण्याचे काय तोटे आहेत.
गरोदर महिलेला याकाळात विविध पदार्थ खाण्याची इच्छा होत असते. त्यानुसार कुटुंबाकडून त्यांचे लाडही पुरवले जात असतात. मात्र काही पदार्थ अति प्रमाणात खाणे नकारात्मक ठरू शकते. गरोदरपणात वांग्याचे जास्त सेवन केल्यास पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होतो. अशा स्थितीत ज्या महिलांना मुळव्याधची समस्या आधीपासूनच आहे त्यांनी यावेळी वांग्याचे सेवन न करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो.
ज्या महिलांना आधीपासूनच मुतखड्याचा त्रास आहे, त्यांना गरोदरपणात अधिक काळजी घेण्याची गरज असते. त्यामुळेच मुतखडा असणाऱ्या महिलांना गरोदरपणातही मुतखड्याचा त्रास होऊ नये म्हणून, वांग्याचे सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो. कारण वांग्यात ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असल्याने मुतखड्याची समस्या आणखी वाढू शकते.
तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, वांगी खाण्यापूर्वी ती नीट शिजवून घेणे फार महत्वाचे आहे. कारण बहुतेक ठिकाणी वांग्याचे पीक टोक्सोप्लाज्मोसिस ग्रस्त जमिनीत घेतले जाते. आणि या मातीतील घटक वेळेआधीच प्रसूतीचे कारण बनू शकतात. त्यामुळेच वांगी नीट धुवून शिजवून खाण्याचा सल्ला दिला जातो. शक्यतो वांगी खाण्याचे प्रमाण याकाळात कमी केलेलेच उत्तम.
काही प्रकरणांमध्ये, वांग्याच्या जास्त सेवनाने महिलांना अॅलर्जी होऊ शकते. त्यामुळे स्त्रीला अंगाला खाज सुटणे किंवा पुरळ येण्याचा त्रास होऊ शकतो. शिवाय पचन व्यवस्थित न झाल्याने अॅसिडिटी होण्याचाही त्रास वाढू शकतो.
संबंधित बातम्या