kitchen tips: पावसाळ्यात भाज्या-फळे खराब होण्याचं टेन्शन विसरा! 'या' टिप्सने आठवडाभर टिकतील
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  kitchen tips: पावसाळ्यात भाज्या-फळे खराब होण्याचं टेन्शन विसरा! 'या' टिप्सने आठवडाभर टिकतील

kitchen tips: पावसाळ्यात भाज्या-फळे खराब होण्याचं टेन्शन विसरा! 'या' टिप्सने आठवडाभर टिकतील

Aug 02, 2024 02:57 PM IST

Monsoon kitchen tips In Marathi: पावसाळयात भाजीपाला, फळे भिजल्याने लवकर खराब होतात. अशात वारंवार बाजारात जाऊन भाजीपाला आणणे शक्य नसते. त्यामुळे भाजीपाला टिकवण्यासाठी स्त्रिया वेगवेगळ्या गोष्टी करत असतात.

पावसाळ्यात भाजीपाला टिकण्यासाठी उपाय
पावसाळ्यात भाजीपाला टिकण्यासाठी उपाय (Unsplash)

Monsoon kitchen tips In Marathi: पावसाळ्यात एन्जॉय करताना जितकी मज्जा येते, तितक्याच अडचणीदेखील येतात. पावसाळ्यात दैनंदिन आयुष्यात विविध समस्या उद्भवतात. आरोग्यापासून खानपानापर्यंत सर्वच बाबतीत समस्या पाहायला मिळतात. सर्वात मोठं टेन्शन तर स्त्रियांना असतं. ते टेन्शन म्हणजे भाजीपाला टिकवणे होय. कारण पावसाळयात भाजीपाला, फळे भिजल्याने लवकर खराब होतात. अशात वारंवार बाजारात जाऊन भाजीपाला आणणे शक्य नसते. त्यामुळे भाजीपाला टिकवण्यासाठी स्त्रिया वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. तरीसुद्धा त्यांना मनासारखं घडत नाही कारण विविध उपाय करूनही भाज्या आणि फळे लगेचच खराब होऊ लागतात. त्यामुळेच आज आम्ही गृहिणींसाठी अशा काही टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुमच्या भाज्या फक्त आठवडा नाही तर तब्बल १५ दिवस टिकून राहतील. पाहूया काय आहेत या टिप्स.

व्हिनेगरचा वापर

पावसाळ्यात भाज्या आणि फळे टिकवणे हे फारच कठीण काम असतं. कारण भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बॅक्टेरिया येतात. त्यामुळे अशावेळी एका मोठ्या भांड्यात पाणी आणि थोडे व्हिनेगर घाला. आता त्यात हिरवा कांदा, सिमला मिरची, टोमॅटो, बेरी, सफरचंद आणि नाशपातीची कोणतीही भाजी ५ मिनिटे बुडवून ठेवा. नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. अशा प्रकारे तुम्ही ते जास्त काळ टिकवून ठेवू शकता.

थंड पाण्याचा वापर

गाजर, बटाटे किंवा सॅलडसाठी वापरल्या जाणाऱ्या विदेशी भाज्या एखादा जार किंवा थंड पाण्याने भरलेल्या कंटेनरमध्ये ठेवल्या जाऊ शकतात. परंतु, भाज्यांचा ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी दर दोन दिवसांनी पाणी बदलणे आवश्यक आहे. पाणी बदलत राहिल्यास त्यातून वास येणार नाही. शिवाय त्या सडणारही नाहीत.

पेपर टॉवेलचा वापर

पावसाळयात भाज्या ताज्या ठेवण्यासाठी आणि दीर्घकाळ टिकवण्यासाठी पेपर टॉवेलचा वापर देखील खूप उपयुक्त आहे. पालक, मेथी किंवा इतर पालेभाज्या यांसारख्या हिरव्या पालेभाज्यांसाठी हे उत्तम कार्य करते. पावसाळ्यात पालेभाज्या लवकर खराब होतात, त्यामुळे त्या कागदी टॉवेलमध्ये गुंडाळल्याने जास्त ओलावा टाळता येतो. अशाने भाज्या लवकर खराब होत नाहीत.

सुती कापडाचा वापर

पावसाळयात सतत आपल्याला बाजारात जाणे शक्य होत नाही. त्यामुळे आणलेल्या भाज्या टिकवणे आवश्यक असते. अशात काकडी, शिमला मिरची, वांगी या भाज्या जास्त काळ ताज्या ठेवण्यासाठी ओल्या सुती कापडात गुंडाळून ठेवाव्या. तसेच त्या भाज्या सुकलया की त्यांच्यावर वेळोवेळी पाणी शिंपडत राहावे. त्यामुळे भाज्या जास्त काळ टिकून राहण्यास मदत होते.

छिद्र असलेले कंटेनर

पावसाळ्यात हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना दीर्घकाळ ताजे आणि टवटवीत ठेवण्यासाठी त्यांना टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून छिद्र असलेल्या कंटेनरमध्ये ठेवा. यामुळे ते बराच काळ ताजे राहतात. महत्वाचे म्हणजे यांना ठेवण्यापूर्वी स्वच्छ करून घेणे गरजेचे आहे. अथवा ते सडण्याची शक्यता असते.

Whats_app_banner