सध्याच्या धावपळीच्या जगात लोक स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. यातूनच अनेक वाईट सवयी शरीराला जडतात. त्यामुळे तुम्हाला अनेक आजारांना तोंड द्यावे लागते. मात्र दररोजच्या सवयींमध्ये अगदी लहान-लहान बदल केल्यास तुम्हाला त्याचा फायदा मिळू शकतो. पाणी हे मानवी शरीरासाठी अत्यंत महत्वाचे असते. शरीरातील घातक घटक बाहेर फेकण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक असते. अनेक डॉक्टर लोकांना जवळपास २ ते ३ लिटर पाणी पिण्याचा सल्ला देतात. पाण्यामुळे मानवी शरीराचे कार्य अगदी उत्तम चालते. परंतु वैद्यकीय क्षेत्रात पाणी पिण्याचेदेखील विविध नियम सांगण्यात आले आहेत. जेणेकरून त्याचा पुरेपूर फायदा आपल्या शरीराला मिळावा.
वैद्यकीय तज्ञांच्या म्हणण्यानुसार, सकाळी उठल्या उठल्या पाणी पिणे शरीरासाठी अत्यंत लाभदायक असते. असे केल्याने शरीरातील क्रिया सुरळीत होतात. शरीर निरोगी राहते. विविध आजारांपासून सुटका मिळते. त्यामुळेच अलीकडे अनेक लोक आपल्या लाइफस्टाइलमध्ये सतत पाणी पिण्याला विशेष महत्व देतात. अनेकजण तर टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन विविध ऍपच्या माध्यमातून हे कार्य करत असतात. या ऍपमधून तुमच्या शरीराला पाण्याची गरज आहे याचे संकेत दिले जातात. ज्यामुळे तुम्ही कितीही व्यग्र असाल तरी पाणी पिणे विसरता येत नाही. आज आपण सकाळी उठल्याबरोबर पाणी पिण्याचे नेमके फायदे काय? हे जाणून घेणार आहोत.
सर्वसाधारणपणे बहुतांश लोक रात्री सुमारे ७ ते ८ तास आवर्जून झोप घेतात. त्यामुळे याकाळात ते काहीही खात किंवा पीत नाहीत. अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा तुमचे पोट अगदी रिकामे असते. अर्थातच तुमचे निर्जलीकरण होते. सकाळी लवकर उठून रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरात रात्रभर झालेले डिहायड्रेशन कमी करण्यास मदत होते. शिवाय तुमचे पोट रिकामे असल्याने तुमचे शरीर जलद गतीने पाणी शोषून घेते. त्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण होऊन थकवा दूर होतो.
त्याचबरोबर रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने शरीरातील पचनशक्ती वाढते. मेटाबॉलिज्म २५ टक्क्यांनी वाढतो. शिवाय शरीरात ऊर्जा निर्माण होऊन आळस दूर होतो. तुमची पचनशक्ती वाढल्याने इम्यून सिस्टम बूस्ट होते. आणि विविध आजारांच्या संक्रमणापासून बचाव होतो. सकाळी उठल्याबरोबर पाणी प्यायल्याने मुतखड्याचा अर्थातच किडनी स्टोनचा धोका कमी होतो. शिवाय पित्ताच्या त्रासापासूनही आराम मिळतो. पित्त कमी झाल्याने त्यापासून उद्भवणाऱ्या डोकेदुखी, उलट्या, चक्कर अशा विविध समस्या दूर होतात.
तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, सकाळी पाणी प्यायल्याने तुमची त्वचा चांगली हायड्रेट राहते. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. असे केल्याने तुमच्या त्वचेची नैसर्गिक चमकदेखील वाढते. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे तुमच्या केसांमध्ये २५% पाणी असते. कमी पाणी पिल्याने तुमचे केस कमजोर होऊ शकतात. सकाळी उठल्याबरोबर पाणी प्यायल्याने केसांची चमक आणि मजबुती वाढते. शिवाय यामुळे वजनही कमी होण्यास मदत होते.
संबंधित बातम्या