जन्मतः हृदयविकार असलेल्या ५० हजार मुलांची मोफत तपासणी करून त्यांच्यावर संपूर्ण मोफत उपचार करणार मुंबईच्या सर एचएन रिलायन्स फौंडेशन रुग्णालयाने जाहीर केले आहे. शिवाय ५० हजार महिलांसाठी स्तन व गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची मोफत तपासणी करून उपचार केले जाणार आहेत. रुग्णालयाला १० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘नवीन आरोग्य सेवा योजना’ (New Health Seva Plan) जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत १० हजार किशोरवयीन मुलींसाठी गर्भाशयाच्या कर्करोगाचे मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी ही घोषणा केली.
दक्षिण मुंबईत अत्याधुनिक आरोग्य सेवा पुरविण्याच्या हेतुने दहा वर्षापूर्वी सर एच एन रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयाची स्थापना करण्यात आली होती. उत्तम आरोग्य हे देशाच्या विकासाचा पाया असून निरोगी महिला आणि मुले प्रगतीशील समाजाचा आधारस्तंभ मानला जातो. या अनुषंगाने रुग्णालयाच्या दशकपूर्तीनिमित्त १ लाख लोकांवर मोफत उपचार करण्याचा संकल्प सोडला आहे, अशी माहिती नीता अंबानी यांनी दिली.
या योजनेबाबत सांगताना नीता अंबानी म्हणाल्या, प्रत्येक भारतीयाला परवडेल व सहज उपलब्ध होईल अशी जागतिक दर्जाची आरोग्यसेवा देण्याच्या ध्येयाने १० वर्षापूर्वी सर एच एन रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयाची स्थापना करण्यात आली होती. गेल्या दहा वर्षाच्या काळात अनेक नागरिकांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण केले आहे. हा महत्वाचा टप्पा साजरा करत असताना समाजातील उपेक्षित वर्गातील मुले व महिलांसाठी मोफत ‘नवीन आरोग्य सेवा योजना’ (New Health Seva Plan) जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ५० हजार मुलांसाठी जन्मतः हृदयविकाराची मोफत तपासणी व उपचार केले जाणार आहे. शिवाय ५० हजार महिलांसाठी स्तन व गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची मोफत तपासणी व त्यावरील उपचार करण्यात येणार आहे. रुग्णालयाकडून १० हजार किशोरवयीन मुलींसाठी गर्भाशयाच्या कर्करोगाचे मोफत लसीकरण करण्यात येणार आहे.
जन्मतः हृदयविकार हा भारतात सार्वजनिक आरोग्याची गंभीर समस्या असून या विकार झालेल्यामध्ये विकृती आणि मृत्यू होण्याचे मोठे प्रमाण आहे. देशातील १०० पैकी एका नवजात बालकांत हा विकास आढळून येतो. तर भारतात महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग मोठ्या प्रमाणात आढळत असून महिलांना होणाऱ्या कर्करोगाच्या एकूण संख्येत स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण २५ टक्के एवढे आहे. स्तनाच्या कर्करोगात अखेरच्या टप्प्यात निदान झालेल्या रुग्णाच्या तुलनेत लवकरच निदान होऊन उपचार झालेल्या रुग्णांची जगण्याची शक्यता अधिक असल्याचे आयसीएआरच्या अभ्यासात आढळले आहे.
संबंधित बातम्या