Health : तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणं का आहे आरोग्यासाठी गुणकारी; वाचा फायदे
Health Tips : भारतात पूर्वीपासूनच घरातील वापरात तांब्याच्या भांड्याला फार महत्त्व दिलं जातं. कारण या धातूच्या ताटात जेवणं आणि ग्लासात पाणी पिणं आरोग्यासाठी गुणकारी मानलं गेलं आहे.
Water Drinking Benefits In Copper Pot : भारतात अनेक शतकांपासून घरात जेवण करण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी तांब्याच्या भांड्याचा वापर करण्यात येतो. कारण तांब्याच्या भांड्याचा घरात वापर करणं हे आरोग्यासाठी फायदेशीर असतं. या धातूचं भांडं अतिशय शुद्ध असल्यानं आजही अनेक घरांमध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. परंतु या तांब्याच्या भांड्यात जेवण करणं किंवा त्यात पाणी पिल्यानं आरोग्याला काय नेमके फायदे होतात, हे माहिती नसतं, चला तर जाणून घेऊयात.
तांब्याच्या भांड्याचे काय आहेत फायदे?
अनेक लोकांच्या शरीरात तांब्याची कमतरता असते. त्यामुळं अशा लोकांनी तांब्याच्या भांड्यात जेवण केल्यास अथवा त्यात पाणी पिल्यास त्यामुळं शरीरातील तांब्याची कमतरता भरून निघते. याशिवाय शरीरातील विविध जिवाणूंपासून बचाव करण्यासाठीही याचा फायदा होत असतो. त्याचबरोबर तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिल्यास त्यामुळं जुलाब, कावीळ, अतिसार यांसारख्या आजारांचा धोका कमी होत जातो.
तांब्यात अँटी-इन्फ्लेमेटरी गुण असल्यानं त्यामुळं शरीराला वेदना, वात आणि सूज येत नाही. याशिवाय त्यामुळं सांधिवाताचा धोकाही कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिल्यामुळं कॅन्सरचा धोका कमी होत असल्याचा दावा अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या एका संशोधनात करण्यात आला आहे.
त्याचबरोबर ज्या लोकांना पोटांचा विकार असल्यास त्या लोकांसाठी तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिणं हे फार फायदेशीर मानलं जातं. कारण त्यामुळं पोटदुखी, गॅस, अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेच्या समस्यांपासून सुटका होत असते. याशिवाय यकृत आणि किडनीच्या आजारांपासूनही आराम मिळतो. ज्या लोकांना अशक्तपणाचा त्रास आहे अशा लोकांनी सातत्यानं तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिणं आवश्यक आहे. कारण तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवल्यास त्यातलं लोह कमी होत असते. त्यामुळं त्याच्या सेवनानं त्वचेवर सकारात्मक परिणाम होतो.
याशिवाय चेहऱ्यावरील फोड आणि तारुण्यापीटिका होत नाही आणि त्वचा साफ आणि चमकदार होण्यास मदत होते. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्यास त्यामुळं पचनक्रिया सुधारण्यास मदत होत असते. याशिवाय हार्ट अटॅकचा त्रास असलेल्या आणि रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांनीदेखील तांब्याच्या भांड्यातील पाण्याचं सेवन करायला हवं. त्यामुळं त्यांना या आजारांपासून आराम मिळू शकतो.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या