Home Remedies For Dengue: सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळा अनेकांना आवडतो. पावसाळयातील वातावरण अनेकजण मनापासून एन्जॉय करत असतात. मात्र पावसाळयात अनेक आजारसुद्धा डोके वर काढतात. पावसाळ्यात विविध आजारांचे संक्रमण वेगाने होते. अगदी सर्दी,खोकला, तापापासून ते डेंग्यूपर्यंतचे आजार बळावतात. याकाळात डेंग्यूची लागण वेगाने होते. सध्या अनेक ठिकाणी डेंग्यूची साथ सुरु आहे. अशात या आजारातून ठणठणीत बरे होण्यासाठी एक घरगुती उपाय आपण पाहणार आहोत. या उपायाने डेंग्यूच्या रुग्णांना प्रचंड फायदा होतो. पाहूया नेमका काय आहे तो उपाय.
प्रत्येक फळ हे कोणत्या ना कोणत्या कारणाने अतिशय खास आहे. अनेक फळांमध्ये औषधीय गुणधर्म आहेत. त्यातीलच एक फळ म्हणजे पपई होय.आयुर्वेदात पपईला प्रचंड महत्व आहे. पपईच्या झाडाचा प्रत्येक भाग जसे की फळे, फुले, बिया आणि पाने या सर्वांमध्ये औषधीय गुणधर्म असतात. या सर्वांचा वापर औषधे बनवताना केला जातो. वास्तविक, पपई हा एक असा फळ आहे जो कच्चा आणि पिकलेला दोन्ही खाऊ शकतो. आपल्या सर्वांना माहित आहे की पपईच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते आणि पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो. परंतु बहुतांश लोकांना माहिती नसेल की, पपईच्या पानांच्या रसाचासुद्धा प्रचंड फायदा आहे. या ज्यूसपासून अनेक गंभीर आजार बरे होऊ शकतात.
पावसाळ्यात डेंग्यूची प्रचंड साथ सुरु असते. सध्याही डेंग्यूचे अनेक रुग्ण सापडत आहेत. अशा स्थितीत पपईची पाने डेंग्यूच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकतात. डेंग्यूच्या बाबतीत पपईच्या पानांचा रस अधिक फायदेशीर मानला जातो. हा रस प्यायल्याने डेंग्यूशी लढण्यास मदत होते. याशिवाय हा रस शरीरातील प्लेटलेट्स वाढवण्यात आणि तापामुळे येणारी कमजोरी दूर करण्यातही गुणकारी आहे. त्यामुळे डेंग्यूच्या रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्याने हा रस देण्यास हरकत नाही.
पावसाळ्यात रोगप्रतिकारक क्षमता काहीशी कमी झालेली असते. असते अनेक रोग मागे लागण्याची शक्यता असते. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याची आवश्यकता असते. अशात पपईच्या पानांचा रस आपल्याला मदत करतो. या पानांच्या रसाने कमजोरी तर दूर होते शिवाय इम्युनिटी पॉवर वाढते. त्यासोबतच पपईच्या पानांच्या रसात पांढऱ्या पेशी आणि लाल पेशी वाढवण्याची क्षमता असते.त्यामुळे डॉक्टरसुद्धा हा रस पिण्याचा सल्ला देतात.
आजकाल बहुतांश लोकांना मधुमेहाचा त्रास जाणवत आहे. अशात स्थितीत पपईच्या पानांचा रस रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास उपयुक्त ठरतो. हा रस स्वादुपिंडातील इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशींचे संरक्षण करण्यास मदत करतो. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. यामुळेच मधुमेहाच्या रुग्णांसाठी पपईच्या पानांचा रस अत्यंत लाभदायक आहे. सध्या अनेक लोक या रसाचा आपल्या जीवनशैलीत समावेश करत आहेत.
संबंधित बातम्या