Cooking Tips Marathi: गृहिणी असो किंवा नोकरदार महिला सर्वांनाच घरातील प्रत्येक काम हे करावेच लागते. त्यातीलच एक महत्वाचे काम म्हणजे स्वयंपाक करणे होय. स्त्रिया स्वयंपाकघरात खूप मेहनत करतात. दररोज विविध प्रकारच्या भाज्या, आमटी नवनवीन चटपटीत पदार्थ त्या बनवत असतात. स्वयंपाक करणे हीसुद्धा एक कला आहे. स्त्रिया मोठ्या सतर्कतेने स्वयंपाक करत असतात. पण घरात खूप पाहुणे आले की तिचं काम वाढतं. किंवा इतर काही कामांची घाई असेल तर याकाळात नेहमी जेवणात कमी-अधिक प्रमाणात तिखटपणा असतो. जेवणात तिखट जास्त पडल्यास अनेकांना त्याचा त्रास होतो. शिवाय स्त्रियांना जेवण बिघडल्याचं टेन्शन येतं.
बहुतांश वेळा जेवणात मीठ किंवा तिखट जास्त प्रमाणात झाल्यास ते पदार्थ खाणे शक्य होत नाही. तर अशावेळी ते पदार्थ उष्ट्यात टाकणे हा शेवटचा पर्याय दिसतो. परंतु एखाद्या खास दिवशी पाहुणे आल्यावर तुम्ही असे काही करू शकत नाही. त्यामुळे अनेकदा स्त्रिया घाबरून जातात. शिवाय त्यांना अनेकदा घरातील लोकांची नाराजी ओढवून घ्यावी लागते. मात्र आता असे होणार नाही. कारण अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला शेफ पंकज भदौरियाच्या काही सोप्या ट्रिक्स सांगत आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही काही वेळेतच जेवणातील तिखटपणा दूर करुन पदार्थ आणखीन चविष्ट बनवू शकता.
शेफ पंकज या टेलिव्हिजनसोबतच सोशल मीडियावरसुद्धा प्रचंड सक्रिय असतात. महिलांना उपयुक्त अशा रेसिपी आणि स्वयंपाकासंबंधी फायदेशीर टिप्स त्या शेअर करत असतात. नुकतंच शेफ पंकज यांनी भाजीत किंवा आमटीत तिखट जास्त झाल्यास काय करावे याबाबत सांगितलं आहे. तर भाजीत तिखट जास्त झाल्यास दही हा एक उत्तम उपाय आहे. भाजीमध्ये दही मिक्स करून किंवा टोमॅटोची प्युरी मिसळून ती भाजी नीट करू शकता. त्यासाठी आधी टोमॅटो प्युरी तेलात शिजवून घ्यावी. त्याने टोमॅटोचा कच्चेपणा दूर होईल.
भाजी किंवा आमटीत तिखट जास्त झाल्यास डेअरी प्रॉडक्ट तुमची विशेष मदत करू शकतात. त्यातीलच एक पदार्थ म्हणजे क्रीम होय. भाजीत तिखटपणा जास्त असेल तर भाजीत क्रीम मिसळून तो कमी करू शकता. अशाने भाजीची टेस्टसुद्धा वाढेल आणि तिखटपणा दूर होईल.
जेवताना तूप खाणे अनेकांना आवडते. मात्र अनेकांना माहिती नसेल की, जेवणात तिखट जास्त झाल्यास तो कमी करण्यासाठी तुपाचा उपयोग होऊ शकतो. भाजी अगदीच तिखट झाली असेल तर त्यात तुपाचे काही चमचे सोडा अशाने भाजीचा तिखटपणा दूर होऊन तुपाने चव वाढेल.
शेफ पंकज यांनी दिलेल्या टिप्सनुसार सुक्क्या भाजीत तिखट जास्त झाले असेल, तर अशावेळी थोडेसे बेसन भाजून त्या भाजीत मिक्स करावे. अशाने भाजीचा तिखटपणा दूर होण्यास ,मदत होते. शिवाय भाजीला दाटसरपणा येतो.
संबंधित बातम्या