Road Accidents: वैयक्तिक अपघात विमा काढणे का महत्वाचे? जाणून घ्या कारण
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Road Accidents: वैयक्तिक अपघात विमा काढणे का महत्वाचे? जाणून घ्या कारण

Road Accidents: वैयक्तिक अपघात विमा काढणे का महत्वाचे? जाणून घ्या कारण

HT Marathi Desk HT Marathi
Updated Feb 25, 2025 07:48 PM IST

भारतात रस्ते अपघातात शेकडो नागरिकांचा मृत्यू होतो आणि हजारो माणसे जखमी होतात. दिवसेंदिवस हे वाढते प्रमाण गंभीर चिंतेचा विषय बनले आहे.

अपघात विमा काढणे का महत्वाचे?
अपघात विमा काढणे का महत्वाचे?

राकेश जैन

भारतात रस्ते अपघातात शेकडो नागरिकांचा मृत्यू होतो आणि हजारो माणसे जखमी होतात. दिवसेंदिवस हे वाढते प्रमाण गंभीर चिंतेचा विषय बनले आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात जगातील केवळ १  वाहने आहेत, पण जागतिक स्तरावरील रस्ता अपघातांमधील मृत्यूंपैकी ११ टक्के मृत्यू भारतात होतात. २०२२ मध्ये देशात एकूण ४,६१,३१२ रस्ते अपघात झाले. या अपघातांमध्ये १,६८,४९१ जणांचा मृत्यू झाला आणि ४,४३,३६६ जण जखमी झाले. मागील वर्षाच्या तुलनेत अपघातांमध्ये ११.९ टक्के, मृत्यूंमध्ये ९.४ टक्के आणि जखमींच्या संख्येत १५.३ टक्के वाढ झाली आहे.

सरकारने रस्ते सुरक्षा सुधारण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. मोटर वाहन (सुधारणा) अधिनियम  २०१९ लागू करणे, राष्ट्रीय महामार्गांवरील अपघातप्रवण ठिकाणे ओळखून दुरुस्त करणे आणि रस्ते अपघातांचे संकलन व विश्लेषण करणे यासारख्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. मात्र, केवळ या उपाययोजनांनी रस्ते अपघात टाळता येणार नाहीत किंवा जीव वाचवता येणार नाहीत. वाहनमालक, चालक आणि प्रवाशांचीही जबाबदारी तितकीच महत्त्वाची आहे. वाहतुकीचे नियम पाळणे, सीट बेल्ट आणि हेल्मेट वापरणे, मद्यधुंद अवस्थेत वाहन न चालवणे आणि वेगमर्यादा न ओलांडणे तसेच वाहनांची योग्य देखभाल करणे आवश्यक आहे.

जागतिक आकडेवारीतून रस्ते अपघातांची तीव्रता दिसून येते आणि वैयक्तिक जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित होते. रस्ते अपघात टाळण्यासाठी वाहन सुरक्षितपणे चालवण्याच्या सवयीसोबतच योग्य सुरक्षासाधनांची निवड करणेही गरजेचे आहे. वाहनांमध्ये एअरबॅग, सीट बेल्ट अलार्म यांसारखी सुरक्षा वैशिष्ट्ये असावीत. दुचाकीस्वारांनी हेल्मेट आणि आवश्यक सुरक्षासाधने वापरणे महत्त्वाचे आहे.

मात्र, सर्व काळजी घेतली तरीही काही वेळा दुर्दैवी रस्ते अपघात होऊ शकतात. अशा परिस्थितीत वैयक्तिक अपघात विमा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. हा विमा प्रकार वाहनमालक-चालकाला आर्थिक मदत प्रदान करतो. रस्ते अपघातामुळे झालेल्या शारीरिक दुखापती, मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्वाच्या घटनांमध्ये विमा संरक्षणाचा निश्चितच उपयोग होतो.

वैयक्तिक अपघात विम्याचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे विमा असले तर आर्थिक मदत मिळतेच, त्याचप्रमाणे आपत्कालीन परिस्थितीत विविध मदत सेवा देखील प्राप्त होतात. यामध्ये टोईंग, रुग्णवाहिका सेवा, रोडसाइड असिस्टन्स आणि कायदेशीर सल्ला यांचा समावेश असतो. या सुविधांमुळे वाहनमालक-चालकाला आपत्कालीन परिस्थिती अधिक सहज हाताळता येते आणि त्यामुळे निर्माण होणारा तणाव आणि गैरसोय कमी होते.

वैयक्तिक अपघात विमा आणि सर्वसमावेशक वाहन विमा यामध्ये फरक आहे. सर्वसमावेशक वाहन विम्यांतर्गत अपघातात वाहनाचे झालेले नुकसान आणि थर्ड पार्टी लाएबिलिटी (अपघातामुळे इतर व्यक्तीच्या शरीराला झालेली इजा किंवा त्यांच्या मालमत्तेचे नुकसान यासाठी वाहनचालकावर येणारी कायदेशीर जबाबदारी.) कव्हर होते. तर वैयक्तिक अपघात विमा हा विशेषतः वाहनमालक-चालकासाठी असतो. या विम्यांतर्गत, अपघात झालेला प्रवासी किंवा पादचाऱ्यांना संरक्षण मिळत नाही. त्यामुळे रस्ते अपघाताच्या कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण संरक्षण मिळावे यासाठी वैयक्तिक अपघात विमा आणि सर्वसमावेशक वाहन विमा दोन्ही असणे आवश्यक आहे.

वाहन विम्यासोबत वैयक्तिक अपघात विमा घेण्याचे फायदे

वैद्यकीय खर्चाचे संरक्षण: अपघात झाल्यास रुग्णालयातील उपचार, औषधे आणि इतर वैद्यकीय खर्चासाठी आर्थिक मदत मिळते.

कायमस्वरूपी अपंगत्वासाठी भरपाई: अपघातामुळे हात, पाय, दृष्टी किंवा ऐकण्याची क्षमता गमावल्यास आर्थिक भरपाई दिली जाते. ही भरपाई पॉलिसीच्या विमा रकमेइतकी असते, जी जास्तीत जास्त रु. 15 लाखांपर्यंत असू शकते.

कायदेशीर वारसासाठी मदत: अपघातात वाहनमालक-चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास, नामनिर्देशित व्यक्ती किंवा कायदेशीर वारसाला आर्थिक भरपाई दिली जाते. यामुळे, उत्पन्नाच्या होणाऱ्या नुकसानाला सामोरे जाण्यास कुटुंबाला आर्थिक मदत मिळते. भरपाईची रक्कम पॉलिसीच्या विमा रकमेइतकी असते, जी जास्तीत जास्त रु. 15 लाखांपर्यंत असू शकते. मात्र, या पॉलिसीमध्ये काही अपवाद असू शकतात, जसे की आत्महत्येचा प्रयत्न, जाणूनबुजून घेतलेली इजा किंवा मद्य किंवा अंमली पदार्थांच्या प्रभावाखाली वाहन चालवणे. अशा प्रकरणांमध्ये दावा मंजूर होण्यावर परिणाम होऊ शकतो.

मानसिक शांतता: केवळ आर्थिक मदतीपुरते मर्यादित न राहता, वैयक्तिक अपघात विम्यामुळे वाहनमालक-चालकाला सुरक्षित असल्याचे वाटते आणि मानसिक शांतता मिळते. रस्ते अपघातामुळे होणाऱ्या अनपेक्षित परिणामांसाठी संरक्षण उपलब्ध असल्याची जाणीव असल्याने रस्ता सुरक्षेकडे अधिक जबाबदारीने पाहण्याचा दृष्टिकोनाला चालना मिळते.

तात्पर्य, वैयक्तिक अपघात विमा हा केवळ आर्थिक मदतीचे साधन नसून भारतातील धोकादायक रस्त्यांवर सुरक्षितता प्राप्त करण्याचा एक महत्त्वाचा आधार आहे. स्वतःच्या सुरक्षेची जबाबदारी घेणे आणि संपूर्ण विमा संरक्षण घेणे यामुळे जीव वाचू शकतो. त्यामुळे वैयक्तिक अपघात विम्यात गुंतवणूक करणे आणि जबाबदारीने, आत्मविश्वासाने वाहन चालवणे अधिक शहाणपणाचे ठरेल.

(लेखक राकेश जैन हे रिलायन्स जनरल इन्शुरन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत) 

Whats_app_banner