Vaibhav Mangale: प्रेक्षक तिकिटाचे पैसे परत घ्यायचा विचार करत होते! वैभव मांगलेंच्या त्या संतापाचं नेमकं कारण काय?
Vaibhav Mangale Angry On Theaters Situations: अभिनेते वैभव मांगले यांनी एक पोस्ट लिहून आपला संताप व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमधून नाट्यगृहांची बिकट अवस्था समोर आणली आहे.
Vaibhav Mangale Angry On Theaters Situations: सध्या प्रेक्षकांची पावली नाटकाकडे वळली आहेत. नाटकांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. मात्र, असे असताना देखील नाट्यगृहांची वाईट अवस्था असल्याने अनेक प्रेक्षक आपली नाराजी वारंवार व्यक्त करत असतात. केवळ प्रेक्षकच नाही तर, कलाकार मंडळी देखील वेळोवेळी या विषयावर भाष्य करताना दिसतात. आता अभिनेते वैभव मांगले यांनी देखील एक पोस्ट लिहून आपला संताप व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमधून नाट्यगृहांची बिकट अवस्था समोर आणली आहे.
वैभव मांगले यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलेय की, ‘पुणे, औरंगाबाद, नाशिक येथे प्रयोग झाले संज्या छायाचे. एका ही ठिकाणी वातानुकुलीत यंत्रणा काम करत नव्हती. रंगमंचावर एवढ्या प्रकाशात काम करताना प्रचंड उकाड्यात अतोनात त्रास झाला. प्रेक्षक डास आणि प्रचंड उकाड्यात (विशेषतः बालगंधर्व पुणे, खूप डास आणि उकाडा, कोथरूड यशवंतराव.. उकाडा) प्रयोग पहात होते. एका मर्यादेनंतर नाशिकमध्ये रसिकांचा राग, हतबलता अनावर झाली. त्यांनी गोंधळ केला. तिकिटाचे पैसे परत घ्यावे का याचा विचार करू लागले. पण आपण शो मस्ट गो ऑनवाले लोक. आम्ही विनंती केली की, आम्हाला ही त्रास होतोच आहे. इथे येई पर्यंत माहित नव्हतं की, एसी नाहीये. आमचे निर्माते दिलीप जाधव यांनी १७ आणि २७चे शो रद्द केले. त्या हवेचे आवागमन नसलेल्या उकाड्यात प्रयोग पार पडला. कालिदासला तर उत्तर द्यायला ही अधिकारी जागेवर नव्हता. या सगळ्यात सगळ्यांची होलपट होतेय. कुणी कुणी आणि कुठे कुठे कशी दाद मागावी??? विचारलं तर सांगतात एसी चालू आहे, पण खूप गर्मी असल्याने एसी यंत्रणा नीट काम करत नाही. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात ही समस्या येत नाही. काय बोलावं या सगळ्यावर वर????????’
अभिनेते वैभव मांगले यांनी आपला संताप पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. त्यांच्या या पोस्टवर प्रेक्षकांनी आणि चाहत्यांनी देखील प्रतिक्रिया देत आपापल्या भागातील नाट्यगृहांची अवस्था सांगितली आहे. एकाने लिहिले की, ‘स्मार्ट सिटीच्या नावाखाली या नाट्यमंदिरावर लागलेले त्यांचे पैसे गेले कुठे? भ्रष्टाचार करून सर्वांनी जन सामान्य लोकांचा विचार व सुविधा ना ठेवता ठेकेदार व लोकप्रिनिधींनीही आपली आर्थिक पोळी भाजून घेतली. एवढ्या मोठ्या शहरात एक साधे सर्व सुविधांनी परिपूर्ण नाट्यगृह उपलब्ध होऊ शकत नाही, ही शोकांतिका आहे.’
आणखी एकाने लिहिले की, ‘वैभव दादा...ही समस्या धुळ्यात देखील आहे. धुळ्यात इतके मोठे नाट्यमंदिर उभारले गेले. परंतु, त्याची कुठल्याही प्रकारची देखभाल झाली नाही. नाट्यगृहांमध्ये एसी नाही.. साऊंड नाही.. स्वच्छता नाही.. त्यामुळे धुळे शहरात गेल्या चार पाच वर्षापासून व्यवसायिक नाटकाचा प्रयोग नाही... शोकांतिका आहे..’