मराठी मालिकांचा १८व्या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट नुकताच समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये अनेक मालिकांनी बाजी मारलेली दिसत आहे. यावेळी पुन्हा एकदा दोन मालिकांमध्ये दुसऱ्या क्रमांकासाठी चढाओढ पाहायला मिळाली. मात्र, या चढाओढीत तेजश्री प्रधान हिच्या मालिकेने बाजी मारली. तर, जुई गडकरी हिची मालिका पुन्हा एकदा टीआरपी चार्टमध्ये पहिल्या क्रमांकावर आली आहे. गेल्या अनेक आठवड्यांपासून सायली आणि अर्जुनची जोडी टीआरपीमध्ये धुमाकूळ घालत आहे. चला तर एक नजर टाकूया १८व्या आठवड्यातील मराठी मालिकांच्या टीआरपी रिपोर्टवर...
‘ठरलं तर मग’ ही मालिका गेल्या काही आठवड्यांपासून सलग पहिल्या स्थानावर आहे. आता वर्षाच्या १८व्या आठवड्यात देखील ६.९चा टीआरपी मिळवत या मालिकेने पहिलं स्थान कायम ठेवलं आहे. सध्या या मालिकेत एक धक्कादायक वळण आलं आहे. अर्जुन आणि सायली एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. मात्र, त्यांच्या लग्नाच्या करारामध्ये असलेल्या एका अटीमुळे दोघांनाही त्यांच्या प्रेमाची कबुली देता येणार नाहीये. त्यामुळे आता दोघांच्याही नात्याला एक वेगळं वळण मिळणार आहे.
तेजश्री प्रधान मुख्य भूमिका साकारत असलेल्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेने ६.६ टीआरपी मिळवत पुन्हा एकदा दुसरं स्थान पटकावलं आहे. गेल्या आठवड्यात ही मालिका तिसऱ्या स्थानावर घसरली होती. मात्र, आता पुन्हा एकदा ही मालिका वरचढ ठरली आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत सध्या मिहिर आणि मिहिका यांच्या साखरपुड्याचा ट्रॅक सुरू होता. मात्र, आयत्यावेळी सावनीने तिथे येऊन मिहिर आपला भाऊ असल्याचे सांगताच हा साखरपुडा मोडला आहे.
‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेने प्रेक्षकांची मन जिंकत आणि ६.५चा टीआरपी मिळवत या आठवड्यात तिसरं स्थान पटकावलं आहे. या आठवड्यात मालिकेत बराच गदारोळ पाहायला मिळाला आहे. कला आणि अद्वैत यांनी राहुल आणि नैनाचं लग्न व्हावं म्हणून अनेक प्रयत्न केले. मात्र, ऐन लग्नाच्यावेळी राहुल आणि त्याच्या आईने नैनाचं किडनॅप केलं. परंतु, कला आणि अद्वैत यांनी तिला शोधून काढलं आणि दोघांचं लग्न लावूनच दिलं.
‘तुझेच मी हित गात आहे’ ही मालिका टीआरपी शर्यतीत चौथ्या स्थानावर आहे. या मालिकेने ६.१चा टीआरपी मिळवला आहे. या मालिकेत वैदही मल्हार आणि स्वरा यांच्या आयुष्यात परतून आली आहे. मात्र, तिचं येणं मोनिकाला अजिबात आवडलेलं नाही. त्यामुळे आता मोनिकाने तिला जीवानिशी मारण्याचा डाव आखला होता. यानुसार ती आता वैदहीला एका गाडीत बसवून अपघात घडवून आणणार आहे. या अपघातात वैदही किंवा मोनिका या दोघींपैकी एकीचाच जीव वाचणार आहे.
‘घरोघरी मातीच्या चुली’ या नव्याने सुरू झालेल्या मालीक्नेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. या मालिकेने ५.६ टीआरपी मिळवत पाचवे स्थान पटकावले आहे. या मालिकेत सध्या चांगलाच गदारोळ पाहायला मिळतोय. ऐश्वर्याने सौमित्रला आउट हाऊसमध्ये बांधून ठेवल्याने आणि सौमित्र ऐवजी तिचं लग्न सारंगशी होणार आहे. मात्र, आपल्याशी लग्न करायला तयार नसलेल्या सौमित्रला ती आयत्यावेळी तिथे मंडपात आणून बसवणार आहे.
संबंधित बातम्या