‘बिग बॉस मराठी’सह मालिका आणि चित्रपटांमधून दमदार भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट देखील व्हायरल होत असतात. बिनधास्त आणि बेधडक असणाऱ्या किरण माने यांची विठ्ठलावर विशेष श्रद्धा आहे. अनेकदा ते आपल्या पोस्टच्या माध्यमातून तुकोबारायांची आणि संतांची शिकवण शेअर करत असतात. त्यांच्या या पोस्टला देखील चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळते. आता त्यांनी पुन्हा एकदा ‘वारकरी संप्रदाया’चा उल्लेख करत एक पोस्ट लिहिली आहे, जी चांगलीच चर्चेत आली आहे.
अभिनेते किरण माने यांनी शेअर केलेल्या या पोस्टमध्ये लिहिलेय की, ‘जातपात, उच्चनीच सगळं पुसून माणसाला माणूस बनवायची धडपड म्हणजे 'वारी'! आपल्या संतांनी भेदाभेद, वर्चस्ववादाविरोधात केलेला खतरनाक विद्रोह म्हणजे 'वारकरी संप्रदाय.' अशा विद्रोही संतांच्या मांदियाळीतला सुरूवातीच्या काळातला निडर हिरो होता - 'सेना न्हावी' ! संत नामदेवांनी हे अनमोल रत्न मध्यप्रदेशातल्या बांधवगड संस्थानातनं शोधून काढलं. संत सेना यांनी आपल्या परखड, रोखठोक शब्दांनी ब्राह्मण्यवादी व्यवस्थेला मुळापास्नं हादरे दिले. त्यावेळी उच्छाद मांडलेल्या विषारी वैदिक पिलावळीला त्यांनी आल्याआल्या इशारा दिला, “आम्ही वारीक वारीक । करू हजामत बारीक ।। विवेक दर्पण आयना दाऊ । वैराग्य चिमटा हालऊ ।। उदक शांती डोई घोळू । अहंकाराची शेंडी पिळू ।।भावार्थाच्या बगला झाडू । काम क्रोध नखे काढू ।। चौवर्णा देऊनी हात । सेना राहिला निवांत ।।”
पुढे त्यांनी लिहिले की, ‘धर्माचे थोतांड मांडून स्वत:चे पोट भरणारी बांडगुळं त्यांना ट्रोल करू लागली. पण सेना महाराज मागं हटले नाहीत. आपल्या धारदार शब्दांच्या वस्तार्यानं त्या ट्रोलर्सची लै बेक्कार भादरायला सुरूवात केली, "धर्माचे थोतांड । करुनि भरी पोट । भार्या मुले मठ । मजा करी ।। पुराण सांगता । नागावानी डोले । अविर्भाव फोल । करीतसे ।। सेना म्हणे ऐशा । दांभिका भजती । दोघेही जाताती । अधोगती ।।" ब्राह्मण्यवादी व्यवस्थेनं बहुजनांना दाखवलेली 'पाप पुण्या'ची भिती उडवून लावत सेना महाराज सांगायचे, पुण्यासाठी यज्ञयाग, अभिषेक करून ब्राह्मणाला दक्षिणा देण्याची अजिबात गरज नाही... माणुसकीच्या नात्यानं परोपकार करा, पुण्य मिळेल... “करीता परोपकार । त्याच्या पुण्या नाही पार ।। करिता परपीडा । त्याच्या पायी नाही जोडा ।।”
'धर्मोपदेश' करून अडाणी कष्टकरी जनतेला भुलवणार्या पाखंडी बुवाबापूंचे बुरखे फाडताना ते म्हणतात, "धर्म उपदेशी मागेल जो अर्धी । तयाचिया प्रीती भजू नये ।। थाटमाट करुनि लुबाडीत रांडा । ऐसिया पाखंडा भुलू नये ।।" एक लक्षात घ्या, हे विचार सेना महाराजांनी मांडलेत तब्बल आठशे वर्षांपुर्वी! त्याकाळात बहुजनांना, "उपास तापास नका करू व्रत । राहा धरुनी चित्त हरी पायी ।।" असा साधासोपा धर्म शिकवणं म्हणजे खायचं काम नव्हतं राजेहो. विशेष म्हणजे शिखांचा पवित्र धर्मग्रंथ, ‘गुरुग्रंथसाहिब’मध्ये संत सेनांच्या एका अभंगाचा समावेश आहे. "जेथें वेदा न कळे पार । पुराणासी अगोचर ।। तो हा पंढरीराणा । बहु आवडतो मना ।। सहा शास्त्र शिणलीं । मन मौनचि राहिली ।। सेना म्हणे मायबाप । उभा कटी ठेउनी हात ।।" कमरेवर हात ठेवून उभा असलेला आमचा बाप तुमच्या चार वेद, अठरा पुराणं, सहा शास्त्रांपेक्षा लै मोठ्ठा हाय हे ठणकावून सांगणार्या सेना महाराजांना त्रिवार वंदन’, असे म्हणत त्यांनी आपली पोस्ट संपवली आहे.
संबंधित बातम्या