सध्या जगभरातील मनोरंजन विश्वात ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ची जोरदार चर्चा सुरू आहे. यावेळी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठी कलाकारांनी देखील आपला चांगला जलवा दाखवलाय. कान्सच्या या मंचावर कला आणि फॅशन जगतातील कलावंतांचा गौरव करण्यात येतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही कलाकारांचा अशाच प्रकारे सन्मान करण्यात आला. यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये. भारताच्या अनेक कलाकारांनी आणि कलाकृतींनी बाजी मारली. एक दोन नव्हे तर तब्बल तीन दशकानंतर भारताला ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये नामांकन मिळालं होतं. ‘ऑल वी इमॅजिन ऍज लाईट’ या भारतीय चित्रपटाला ‘कान्स’मध्ये नामांकन मिळालं होतं. इतकंच नाही तर, या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे श्रेणीत पाल्मे डी’ओर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. या चित्रपटात मराठमोळ्या अभिनेत्री छाया कदम हिची महत्त्वाची भूमिका होती.
कान्समध्ये अभिनेत्री छाया कदम यांनी आपल्या अभिनयाचा जलवा तर दाखवलाच. पण, फॅशनच्या बाबतीतही मराठी कुठेच मागे नाही हेही त्यांनी सगळ्यांना दाखवून दिले. कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या मंचावर भारताची आणि मराठी प्रेक्षकांची मान गर्वाने उंच करणाऱ्या छाया कदम यांचे सर्वसरातून कौतुक होत आहे. कान्स चित्रपट महोत्सवात ‘ऑल वी इमॅजिन ऍज लाईट’ या चित्रपटाचा प्रीमियर होताच या चित्रपटातील कलाकारांना आणि चित्रपटाला उपस्थित मान्यवरांनी उभे राहून मानवंदना दिली आणि टाळ्यांच्या कडकडाटात या अभिनेत्रीचे सर्वांनीच कौतुक केले. हा अभिमानाचा क्षण सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
आता छाया कदम यांनी कान्स महोत्सवातील कौतुक सोहळ्यानंतर अभिनेत्री छाया कदम यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात पुरस्कार स्वीकारताना काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना कॅप्शन कॅप्शन देताना छाया कदम यांनी अनेकांचे आभार मानले आहेत. त्यांनी आपल्या फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आपल्या मातीतल्या आपल्या माणसांची गोष्ट आपल्या वाटेला येते तेव्हा, तिच्यात जीव ओतून टाकलेला एक एक क्षण जेव्हा कान्स फिल्म फेस्टीवल उजाळून टाकतो, तेव्हा आपल्या मागच्या सगळ्या प्रवासातल्या सगळ्या सिनेमांची-लेखकांची आणि दिग्दर्शकांची आठवण येते. कारण त्यांनी त्या त्या वेळेस माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळेच, एक एक पाऊल पुढे पडत हा प्रवास इथपर्यंत येऊन पोहचला आहे. माझ्या आजवरच्या प्रवासातल्या सगळ्यांचे खूप खूप आभार. की तुमच्यामुळे आज ही छाया इथवर पोहचली आहे. खूप समाधान - आनंद आणि मन भरून आले.’
त्यांच्या या कॅप्शनने देखील सगळ्यांचीच मनं भरून आली आहेत. या पोस्टमधून त्यांनी आपल्या आजवरच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सगळ्यांचे मनापासून आभार मानले आहेत.
संबंधित बातम्या