‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात चैतन्य आणि साक्षी यांचा साखरपुडा होताना पाहायला मिळणार आहे. एकीकडे चैतन्य आपल्या साखरपुड्याच्या आनंदात आहे. तर, दुसरीकडे दुसरीकडे साक्षीचा खरा चेहरा आता त्याच्या समोर उघड होणार आहे. दोघांच्या साखरपुड्याची जोरदार तयारी सुरू असताना आता सुभेदार कुटुंब देखील चैतन्याच्या साखरपुड्यात सामील होणार आहे. त्यांना पाहून चैतन्य अतिशय आनंदी झाला आहे. आपल्या आयुष्यातील इतक्या मोठ्या टप्प्यावर आपल्या कुटुंबाचं येणं चैतन्यसाठी एक सुखद धक्काच होता. चैतन्य हा अर्जुनचा मित्र असला, तरी सुभेदार कुटुंबांने त्याला आपल्या मुलाप्रमाणेच वाढवलं आहे. अर्जुन इतकंच प्रेम त्यांनी चैतन्यला देखील दिले. त्यामुळे कितीही वाद झाले, तरी चैतन्यच्या आयुष्यातील या टप्प्यावर त्याची साथ द्यायची, असा निर्णय सगळ्यांनी घेतला.
तर, अर्जुन देखील चैतन्यच्या या आनंदात सामील होणार आहे. अर्जुन देखील सायलीसोबत चैतन्य आणि साक्षीच्या साखरपुड्याला पोहोचला आहे. अर्जुनला बघून चैतन्यच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तर, आपला मित्र या साक्षीच्या तावडीत अडकू नये, म्हणून अर्जुनची धडपड अजूनही सुरूच आहे. आपण आपल्या मित्राला वाचवू शकू, यासाठी अर्जुन आणि सायली सतत प्रयत्न करताना दिसत आहेत. साखरपुड्याची लगबग चालू असताना आता अर्जुन संधी साधून चैतन्यला गाठणारच आहे. चैतन्य एकटाच सापडला हे बघून आता अर्जुन आणि सायली त्याला साक्षीची सगळी सत्य उघड करून सांगणार आहेत.
इतकंच नाही तर, सायली-अर्जुन साक्षी आणि कुणालचे काही फोटो, काही जुनी ग्रीटिंग्स देखील चैतन्यला दाखवणार आहेत. त्यामुळे आता साक्षीचा हा सगळा डाव चैतन्यसमोर उघड होणार आहे. साक्षीत कुणालची गर्लफ्रेंड होती आणि हिच्यामुळेच कुणालने आत्महत्या केली, हे कळल्यावर चैतन्यला देखील मोठा धक्का बसणार आहे. कुणाल हा अर्जुन आणि चैतन्य यांचा बेस्ट फ्रेंड होता. त्याच्या आत्महत्येमुळे दोघांनाही धक्का बसला होता. आता कुणालच्या आत्महत्येमागे साक्षीच होती, हे लक्षात आल्यानंतर चैतन्यच्या पायाखालची जमीन सरकली आहे.
सगळं काही ऐकल्यानंतर आता चैतन्य साक्षीशी साखरपुडा मोडण्याचा निर्णय घेणार आहे. मात्र, हा साखरपुडा मोडण्यापासून अर्जुन त्याला रोखणार आहे. हे नाटक साक्षीने सुरू केलं होतं, मात्र याचा शेवट आपण करणार, असं म्हणत सायली, चैतन्य आणि अर्जुन तिघेही नवा डाव रचणार आहे. तर, चैतन्यने अर्जुन बद्दलचा सगळा राग मनातून काढून टाकून, पुन्हा एकदा अर्जुनला आपल्या हृदयात जागा दिली आहे. याचाच अर्थ दोघांमधील भांडण मिटले असून, आता पुन्हा एकदा दोघे एक होऊन अन्यायाच्या विरोधात लढताना दिसणार आहेत.
संबंधित बातम्या