Tharala Tar Mag 3 July 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात अर्जुन ‘गुड बॉय’ बनून सायलीचं मन जिंकून घ्यायचा प्रयत्न करत आहे. अर्जुन प्रत्येक गोष्ट इथेतिथे टाकून विसरून जातो, गोष्टी वेळच्यावेळी आणि जागच्या जागी ठेवत नाही म्हणून सायली त्याच्यावर राग धरून बसली आहे. अर्थात तिचा हा राग अगदी लटका आहे. मात्र, अर्जुनने तो खरंच मनावर घेऊन आता आपण सायलीच्या मनातील गुड बॉयसारखं बनायचं, असं त्याने ठरवलं आहे. कधी नव्हे तो अर्जुन सकाळी लवकर उठून देवपूजा करताना दिसणार आहे. सकाळी एवढ्या लवकर घंटी वाजवून आरती कोण करतंय हे बघण्यासाठी सगळे सुभेदार रूमबाहेर येणार आहेत. तेव्हा देवघरात अर्जुनला बघून सगळ्यांना धक्का बसणार आहे.
देव न मानणारा अर्जुन चक्क देवापुढे बसून पूजा करतोय, हे बघून सगळ्यांना आश्चर्य वाटतं. यानंतर अर्जुन सगळ्यांना दम भरतो की, ‘तुम्ही कोणीच लवकर उठला नाहीत आणि देवपूजेसाठी आला नाहीत. आता पटापट तयार व्हा आणि नाश्त्याला या’. घरातील सगली मंडळी सकाळचं अंघोळ वगैरे आटोपून येईपर्यंत अर्जुनने स्वतः नाश्ता बनवून टेबलवर सर्व्ह देखील केला आहे. अर्जुनचं हे रूप पाहून घरातील सगळ्यांनाच आश्चर्य वाटत आहे. अर्जुनला असं वागताना पाहून आता कल्पना आई सायलीला विचारणार आहे की, तू अशी काय जादू केली की, एका रात्रीत इतका बदलला? त्यावर सायली म्हणते की, ‘काही नाही कॉफी पिताना मी त्यांना थोडासा दम भरला म्हणून त्यांचं हे सगळं नाटक सुरू आहे. नव्याचे नऊ दिवस असल्यासारखं आहे, थोड्या वेळातच हे संपेल बघा तुम्ही..’
मात्र, कल्पना तिला कोपरखळी मारून तिथून निघून जाते. तर, सायली देखील तिच्या बोलण्याने लाजते. दुसरीकडे किल्लेदारांच्या घरात तन्वी सापडत नसल्याने मोठा गदारोळ माजला आहे. आता रविराज, नागराज आणि कुसुम सगळ्यांना फोन करून खोटी तन्वी म्हणजेच प्रियाबद्दल विचारणा करत आहेत. मात्र, तन्वी इथे आलेली नाही, असेच उत्तर त्यांना सगळीकडून मिळत आहे. त्यामुळे सगळेच घाबरून गेले आहेत. दुसरीकडे तन्वीचा एक व्हिडीओ मेसेज सगळ्यांच्याच फोनवर आला आहे. एकीकडे अर्जुन आणि सायली यांच्यासह सुभेदार कुटुंबांनी हा मेसेज पाहिला आहे. तर, दुसरीकडे साक्षी आणि महिपत यांच्या फोनवर देखील हा व्हिडीओ पोहोचला आहे. हा व्हिडिओ पाहून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे.
या व्हिडीओमध्ये तन्वी म्हणत आहे की, ‘मी तन्वी किल्लेदार असून, मला माझ्या सख्ख्या काकाकडून म्हणजेच नागराजकडून आणि महिपत व साक्षी शिखरे यांच्याकडून जीवाला धोका आहे. आश्रम केसमध्ये साक्षी शिखरे हिनेच विलासचा खून केला असून, आपणच या खुनाचे साक्षीदार आहोत. मात्र, आपल्याला पैशाचे आमिष दाखवून खोटा जबाब द्यायला लावला. पण, आता आपण माफीचे साक्षीदार व्हायला तयार आहोत’, असं म्हणत प्रियानं सगळ्यांची पोलखोल केली आहे. आता प्रिया नक्की कुठे गेली आहे आणि तिच्यासोबत काय घडलं आहे, हे मालिकेच्या येत्या भागात कळणार आहे.
संबंधित बातम्या