‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात धमाकेदार कथानक पाहायला मिळणार आहे. साक्षी महिपतला भेटायला गेली असताना सायली आणि अर्जुन तिच्या घरी पुरावे शोधण्यासाठी पोहोचणार आहेत. यात चैतन्य त्यांची मदत करणार आहे. अर्जुन आणि सायली पुराव्यांची शोधाशोध करत असताना साक्षी घरी परतणार आहे. दुसरीकडे साक्षीने महिपतला अर्जुन आणि सायलीच्या लग्नाविषयी सगळं सत्य सांगितलं आहे. सायली ही अर्जुनची खरी बायको नसून, त्या दोघांमध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालेले आहे, असे साक्षीने महिपतला सांगितले. तर, दोघांच्या या लग्नाचा आपल्याला काय उपयोग असा प्रश्न त्याला पडला. यावर उत्तर देताना साक्षी म्हणाली की, सायली हा अर्जुनचा कणा आहे आणि सायली त्याच्यापासून दुरावली तर, तो या केस मध्ये लक्ष देणार नाही. मग आपण या केसमधून आपण आरामात सुटू.
यानंतर साक्षी घरी परतते, तेव्हा समोर सायली आणि अर्जुनला पाहून ती चकित होते. तर, साक्षीला समोर पाहून चैतन्य अर्जुन आणि सायलीला घरातून हाकलून देण्याचं नाटक करतो. चैतन्य साक्षीकडे बघून तिला म्हणतो की, ‘हे दोघे कल्पना आईचा निरोप घेऊन इकडे आले होते. आपल्या दोघांचा साखरपुडा झाला, आता लवकरात लवकर लग्न करावं, असं कल्पना आईचं मत आहे आणि कल्पना आईचा हाच निरोप घेऊन मुद्दाम हेच दोघे इथे आलेत. मी यांना केव्हापासून घराबाहेर काढायचा प्रयत्न करतोय’, असं बोलून तो दोघांनाही घरातून बाहेर हाकलून लावतो.
चैतन्याच्या या हुशारीमुळे अर्जुन आणि सायली यांची ही गोष्ट साक्षीच्या नजरेत येता येता सुटते. आता चैतन्य साक्षीसाठी खोटं डिनर डेट प्लॅन करतो. यावेळी तो तिच्या ड्रिंकमध्ये झोपेच्या गोळ्या मिसळतो. हे ड्रिंक प्यायल्यानंतर साक्षीला झोप येऊ लागते. त्यावेळी चैतन्य साक्षीला आपण सेल्फी काढूया, असं म्हणत तिचा फोन घेतो आणि तो अनलॉक करतो. इतक्यात साक्षी झोपेच्या गोळ्यांमुळे झोपून जाते. तर, चैतन्य ताबडतोब तिच्या फोनमधले सगळे पुरावे आपल्याकडे घेऊन, तिचा फोन पुन्हा लॉक करून परत ठेवून देतो. दुसऱ्या दिवशी तो पहिला सायली आणि अर्जुन यांना गाठून सगळे पुरावे दोघांच्याही हवाली करतो.
चैतन्य जीवावरही बेतू शकतं, तरीही त्याने इतकी मोठी रिस्क घेतल्याबद्दल सायली आणि अर्जुन त्याचे आभार मानतात. दुसरीकडे एका मोठ्या चुकीतून आपल्याला वाचवल्यामुळे चैतन्य देखील अर्जुन आणि सायलीचे आभार मानतो. शिवाय, कुणालच्याही खुन्याला आपल्याला शिक्षा द्यायची आहे, असं म्हणत तिघेही पुढचा प्लॅन आखू लागतात. साक्षीकडून सगळे पुरावे तर मिळाले आहेत. मात्र, या पुराव्यात असलेली एक मुलगी ही या केसमध्ये अतिशय महत्त्वाची साक्षीदार आहे. तिला शोधण्यासाठी आता सायली आणि अर्जुन बाहेर पडणार आहेत. मात्र, तिच्या घराला टाळा पाहून ते तिथून निघणार इतक्यात घरातून तिचा आवाज येणार आहे. आता मालिकेत पुढे काय घडणार हे येत्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या