Tharala Tar Mag 25 June 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेला प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळत आहे. टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका आपलं पहिलं स्थान टिकवून आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. सध्या यात प्रेम, मैत्री आणि सत्याची लढाई असं सगळं रंजक कथानक एकत्र पाहायला मिळत आहे. चैतन्यने सगळे आरोप स्वतःवर घेत आपल्या मैत्रीची जाण ठेवली आहे. तर, सायली आणि अर्जुन एकमेकांवरील अव्यक्त प्रेमासाठी अनेक गोष्टी करताना दिसत आहे. दुसरीकडे, चैतन्य, सायली आणि अर्जुन तिघेही मिळून सत्याची लढाई लढत आहेत.
‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात बार काऊन्सिलमध्ये अर्जुन आणि चैतन्य यांच्या विरोधातील प्रकरणाची सुनावणी होताना दिसणार आहे. यावेळी रविराज दोघांनाही मदत करताना दिसणार आहे. तर, सायली आणि सुभेदार कुटुंब अर्जुन आणि चैतन्य यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे. मात्र, बार काऊन्सिल आता दोघांची सनद रद्द करणार का? हे लवकरच कळणार आहे. तत्पूर्वी अर्जुनला टेन्शनमध्ये आलेलं पाहून चैतन्य अतिशय कठोर पाऊल उचलणार आहे. एकीकडे बार काऊन्सिल उलट सुलट प्रश्न करून साक्षीच्या बाजूने निर्णय देण्याचा प्रयत्न करतेय, हे लक्षात आल्यामुळे अर्जुनची चिडचिड होतेत. तर, रविराज त्याला शांत राहण्यास सांगतोय.
एकीकडे अर्जुन या वागण्यामुळे वैतागला आहे. तर, दुसरीकडे सायली अर्जुनला बार काऊन्सिलने काय निर्णय दिला, हे विचारण्यासाठी फोन करत आहे. मात्र, वैतागलेला अर्जुन सायलीला आपण नंतर बोलू, असं बोलून तिचा फोनच ठेवून देणार आहे. अर्जुनला होत असलेला हा त्रास बघून चैतन्यला वाईट वाटत आहे. या सगळ्याला आपणच कारणीभूत असल्याचं म्हणून चैतन्य स्वतःला दोष देणार असून, तडकाफडकी तिथून निघून जाणार आहे. चैतन्य कुठे गेला, म्हणून त्याला सगळेच शोधू लागणार आहेत. दुसरीकडे, नागराज आणि साक्षी महिपतला भेटायला जाऊन अर्जुन आणि चैतन्यची वकिली सनद रद्द होणार आहे, असं म्हणतात.
आता चैतन्य प्रेस कॉन्फरन्स घेऊन या प्रकरणाशी अर्जुनचा काही संबंध नसल्यामुळे सगळे आरोप स्वतःवर घेत असल्याचे म्हणणार आहे. त्यामुळे आता बार काऊन्सिल अर्जुनला निर्दोष ठरवून चैतन्यची सनद सहा महिन्यांसाठी रद्द करणार आहे. त्यामुळे अर्जुन आणि चैतन्य दोघेही आनंदी झाले आहेत. कायमस्वरूपी कोणालाही याचा फटका बसणार नसून, केवळ सहा महिन्यांसाठी चैतन्यला त्याच्या वकिलीच्या कामापासून दूर राहावं लागणार आहे. मात्र, चैतन्य अर्जुनला त्याच्या या केसमध्ये मदत करू शकणार आहे. हे प्रकरण संपल्यानंतर आता प्रिया अर्जुन आणि चैतन्यला भेटण्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये जाणार आहे. खरंतर प्रियाला सायली आणि अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल हवी आहे. मात्र, ही फाईल कशी चोरायची याचं प्लॅनिंग प्रिया करत असते. प्रियाला बघून चैतन्य आणि अर्जुन जेवायला जाण्याचा बहाणा करून तिकडून उठून निघून जाणार आहेत. त्याच वेळी प्रियाच्या हाती अर्जुनच्या कपाटाची चावी लागणार आहे. अर्जुन आणि चैतन्य बाहेर गेल्याची संधी साधून, प्रिया त्याच्या कपाटातून कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल मिळवण्यात यशस्वी होणार आहे. मात्र, ती बाहेर पडणार इतक्यातच अर्जुन आणि चैतन्य तिथं पोहोचणार आहेत. आता प्रियाची चोरी पकडली जाणार का? हे मालिकेच्या येत्या भागात कळणार आहे.
संबंधित बातम्या