Tharala Tar Mag 23 October 2024 Serial Update : ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात एक ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. अर्जुनने आयत्यावेळी येऊन महिपतला आश्रम तोडण्यापासून रोखल्याने आता सायली त्याच्यावर खूपच खुश झाली आहे. तर, सायलीला आनंदी बघून अर्जुनदेखील मनातून सुखावून गेला आहे. आता अर्जुन आणि चैतन्य दोघेही मिळून या केसवरची पुढची तपासणी सुरू करणार आहेत. दरम्यान, सायली आपला आनंद कुसुमताईकडे व्यक्त करणार आहे. आश्रमातून परतल्यानंतर कुसुमताई देखील सायली बरोबर सुभेदारांच्या घरी आली होती.
यावेळी सायली कुसुमताईला आपल्या मनातील भावना सांगताना म्हणणार आहे की, ‘बघ तू म्हणत होतीस ना की अर्जुन सर काहीच करणार नाहीत. त्यांना आपल्याबद्दल काहीच वाटत नाही, पण तसं काही नाहीये. त्यांनी कसं अगदी वेळेवर हिरोसारखी एन्ट्री घेऊन आपला आश्रम वाचवला. ते मनाने खूपच चांगले आहेत. मला त्यांच्या सोबतच्या या नात्यातून कधीही बाहेर पडायचं नाही.’ यावर कुसुमताई सायलीला म्हणते की, ‘तू अर्जुनच्या प्रेमात आंधळी झाली आहेस. पण, याआधी तो तुझ्यावर प्रेम करतो की नाही, हे त्याच्याकडून जाणून घे. एकतर्फी प्रेम तुला खूप त्रास देईल.’ यावर सायली कुसुमताईला म्हणते की, ‘मी नक्कीच त्यांना या गोष्टी विचारेन. मात्र, मधुभाऊंची केस पूर्णपणे सुटेपर्यंत मला थांबायचे आहे.’ तर, कुसुमताई सायलीला म्हणते की, ‘आपण या केसच्या यशाच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलं आहे. त्यामुळे आता तू अर्जुनशी याबाबतीत बोलून घे.’
सायली म्हणते की, ‘हो मी नक्कीच याविषयी अर्जुन सरांशी बोलेन आणि मला खात्री आहे की, अर्जुन सरांच्या मनात देखील माझ्याविषयी प्रेम असेल. तर, कुसुमताई म्हणते की, ‘प्रेम असेल तर चांगली गोष्ट आहे. मात्र, नसेल तर काय करणार?’ यावर सायली म्हणते की, ‘नसेल तर मी मधु भाऊंसोबत आश्रमात परत जाईन.’
त्याचवेळी अर्जुन देखील दाराबाहेर उभा असतो. त्याने कुसुमताई आणि सायलीचं पूर्ण बोलणं ऐकलेलं नसतं. मात्र, मी मधु भाऊसोबत आश्रमात निघून जाईन, हे इतकंच वाक्य त्याच्या कानावर पडतं. मिसेस सायली आपल्याला सोडून जाणार, या विचाराने त्याला अतिव दुःख होतं. मनाने खचून गेलेला अर्जुन चैतन्यकडे जाऊन त्याला या सगळ्या गोष्टी सांगणार आहे. यामुळे आता अर्जुन आणि सायली यांच्या नात्यात गैरसमजाची ठिणगी पडणार आहे. दोघांमधील हा गैरसमज आता कुठलं रूप घेणार आहे, हे मालिकेचे येत्या भागात पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या