मालिका विश्वात सध्या ‘ठरलं तर मग’ ही मालिका चांगलीच गाजत आहे. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात हक्काची जागा मिळवली आहे. या मालिकेत सध्या अनेक नवे ट्वीस्ट पाहायला मिळत आहेत. आता या मालिकेत वट पौर्णिमा विशेष भाग पाहायला मिळणार आहे. यावेळची वट पौर्णिमा ही सायली आणि अर्जुन दोघांसाठी खूपच खास आहे. दोघांची ही पहिली वटपौर्णिमा आहे. सध्या दोघांवरही मोठं संकट आलं आहे. साक्षीच्या खोट्या आरोपांमुळे अर्जुन आणि चैतन्य दोघेही अडचणीत सापडले आहेत. मात्र, आता सुभेदारांच्या घरात आता वट पौर्णिमेचा उत्साह आहे. सायली आणि अर्जुन एकमेकांसाठी वट पौर्णिमेचा उपवास ठेवणार आहेत.
‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात वट पौर्णिमेची पूजा पाहायला मिळणार आहे. अर्जुनला सायलीसोबत पूजा करायची आहे. पण, तो स्वतःहून हे बोलू शकत नव्हता. त्यामुळे आता शक्कल लढवून अर्जुन गुरुजींना सगळ्यांसमोर तुम्ही मला आग्रह करा, असं सांगतात. ठरल्याप्रमाणे सायली पूजा करत असताना गुरुजी सगळ्यांसमोर अर्जुनलाही पूजा करण्याचा आग्रह करणार आहेत. गुरुजींनी असं बोलताच, अर्जुन तुम्ही आग्रह करताय म्हणून मी पूजा करतो, असं म्हणत पूजा करणार आहे. आता अर्जुन सायलीच्या बाजूला येऊन बसणार आहे. त्यावेळी सायली लाजणार आहे. यावर अर्जुन सायलीला म्हणतो की, आपण पूजा करुयात.
त्यानंतर दोघेही जोडीने वडाची पूजा करू लागतात. सायली लाजत असली, तरी ती मनातून खूप सुखावली आहे. आता दोघेही पूजा करणार आहेत. यावेळी सायली मनात म्हणणार आहे की, ‘देवी सावित्री आई, माझं सौभाग्य तुझ्या इतकं ताकदवान ठरु दे. या नात्याचं पुढे काय होईल, याबद्दल मला माहित नाही. पण, माझ्या मनातलं अर्जुनबद्दलचं प्रेम आता कधीच कमी होणार नाही’.
सायली आणि अर्जुन वडाची पूजा करताना आता जोरदार पाऊस पडू लागणार आहे. पाऊस पडत असताना सगळ्या स्त्रिया बाजूला जाऊन उभ्या राहतात. मात्र, सायली आपल्या फेऱ्या पूर्ण करत राहते. हे बघून सायलीबद्दल अर्जुनच्या मनात प्रेम उफाळून येतं. तो एक मोठं केळीचं पान घेऊन सायलीच्या आणि स्वतःच्या डोक्यावर धरून तिच्यासोबत फेऱ्या मारू लागतो. हे पाहून सगळेच सायली आणि अर्जुनचं कौतुक करू लागणार आहेत. घरी आल्यानंतर देखील सगळे अर्जुनला कोपरखळ्या मारणार आहेत. दुसरीकडे, अर्जुन देखील सायलीसाठी निर्जळी उपवास ठेवणार आहे.
संबंधित बातम्या